Saint Muktabai Palkhi: साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचे चिखलीत मोकळा भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. सांस्कृतिक समारोहात नगराध्यक्ष, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग
वारकऱ्यांच्या सेवेत सामाजिक संस्था, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
चिखली (Saint Muktabai Palkhi) : महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड श्रद्धेचा जिवंत वारसा असलेली साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेली संत मुक्ताबाईंची पालखी मुक्ताईनगर येथून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली असून, तिचे चिखली शहरात मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. "ज्ञानोबा-तुकाराम" आणि "जय मुक्ताई"च्या अखंड गजराने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
30 जुन रोजी चिखली येथील नयन बोंद्रे यांच्या सुखकर्ता मंगल कार्यालयात पालखीचा (Saint Muktabai Palkhi) मुक्काम झाला. यावेळी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी पालखीचे दर्शन घेऊन वारकऱ्यांची सेवा केली. बी.ए. एम. एस. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार व आवश्यक मदत देत समाजसेवेचा आदर्श घालून दिला.
पुढील प्रवासासाठी पालखीने प्रस्थान करताच मेहकर फाटा (भालगाव फाटा) येथे भालगावच्या सरपंच सौ. मीना संतोष परीहार तसेच ग्रामस्थांनी पालखीचे मनोभावे पूजन करून वारकऱ्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व वारकऱ्यांना थंड पाणी, अल्पोपहार आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यानंतर आदिमाया शक्ती मुक्ताई नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेराळा येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने महाराणा प्रताप विद्यालय येथे दिंडीतील वारकऱ्यांसाठी अन्नदानाचा भव्य उपक्रम राबविण्यात आला. पंचक्रोशीतील भाविकांनीही या महाप्रसादाचा लाभ घेतला. विविध सेवाभावी संस्थांनी आणि नागरिकांनी वारकऱ्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतल्याने संपूर्ण परिसरात सेवाभावाचे सुंदर दर्शन घडले.
मुक्ताईनगर ते पंढरपूर असा सुमारे साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास करणारी संत मुक्ताबाईंची पालखी (Saint Muktabai Palkhi) महाराष्ट्रातील अत्यंत मानाच्या आणि ऐतिहासिक पालख्यांपैकी एक मानली जाते. शेकडो वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही वारी केवळ धार्मिक यात्रा नसून समता, बंधुभाव, सेवा, त्याग, शिस्त आणि मानवतेचा संदेश देणारी लोकचळवळ आहे. महाराष्ट्रातील दिंडी परंपरा ही वारकरी संप्रदायाचे सांस्कृतिक वैभव आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड घोषात हजारो वारकरी अनेक दिवस पायी चालत विठ्ठल भेटीसाठी निघतात. जात, धर्म, पंथ, श्रीमंती-गरीबी यांचे सर्व भेद विसरून प्रत्येक वारकरी "माऊली" म्हणून एकमेकांना संबोधतो. त्यामुळे वारी ही सामाजिक समतेचे, बंधुभावाचे आणि मानवतेचे सर्वोत्तम उदाहरण मानली जाते.
संत मुक्ताबाईंची (Saint Muktabai Palkhi) पायी वारी ही संत ज्ञानेश्वरांच्या संतपरंपरेतील भक्ती, सेवा आणि अध्यात्माचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणारी पवित्र परंपरा आहे. मुक्ताईंच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मार्गातील प्रत्येक गावात भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. पालखीचे स्वागत, अन्नदान, पाण्याची व्यवस्था आणि वारकऱ्यांची सेवा करून महाराष्ट्राची "अतिथी देवो भव" ही संस्कृती आजही जिवंत असल्याचे या वारीतून अधोरेखित होते. चिखलीतील मुक्कामा दरम्यान झालेल्या भक्तिमय वातावरणाने आणि विविध स्तरांतून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याला विशेष भावनिक उंची प्राप्त झाली. "जय मुक्ताई" आणि "विठ्ठल विठ्ठल"च्या अखंड गजरात पालखीने पुढील प्रवासासाठी प्रस्थान केले असून, पुढील मुक्काम मेरा चौथी येथील देशमुख मंगल कार्यालयात होणार आहे.