Latur Police: लातूरमध्ये पोलिसांनी 'पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर' उपक्रमांतर्गत ४९ शेत रस्त्याचे वाद मिटविले, सामाजिक सलोखा व कायदेशीर बाबींचा विचार करून.
लातूर (Latur Police) : 'पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर' या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पोलिसांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन आतापर्यंत जिल्ह्यात ४९ तंटे मिटवून निकाली काढले आहेत. रेणापूर पोलीस ठाणे (Latur Police) हद्दीतील नेहरू नगर शिवारामध्ये अर्जदार सोमनाथ रमेश भोसले यांनी दिनांक १०/०२/२०२६ रोजी शेती रस्त्याच्या वादासंदर्भात तक्रार (एनसी क्र. ८४/२६) दाखल केली होती.
सदर वाद हा अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात मागील दोन वर्षांपासून सुरू होता. या कालावधीत परस्परांविरुद्ध ४ वेळा एनसी दाखल झाल्या होत्या. शेतात जाण्यासाठी १० फूट रुंदीचा रस्ता देण्याच्या मुद्द्यावरून वारंवार वाद, भांडणे व पोलीस तक्रारी होत होत्या; मात्र कायमस्वरूपी तोडगा निघत नव्हता. या (Latur Police) उपक्रमांतर्गत पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी स्टाफसह प्रत्यक्ष शेतात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गावातील प्रतिष्ठित नागरिक व दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवून सखोल चर्चा करण्यात आली. वादाचे मूळ कारण समजून घेऊन, सामाजिक सलोखा जपण्याच्या दृष्टीने व कायदेशीर बाबींचा विचार करून दोन्ही पक्षांची समजूत काढण्यात आली. परिणामी, दोन्ही पक्षांच्या संमतीने सामोपचाराने वाद कायमचा मिटविण्यात आला.
मुरुड पोलीस ठाणे (Latur Police) हद्दीतील भोसा येथे शंकर रंगराव खोसे, भीमराव रंगराव खोसे व लक्ष्मण व्यंकट खोसे यांच्यात ८ ते १० वर्षांपासून शेत रस्त्याचा वाद सुरू होता.या वादाच्या अनुषंगाने यापूर्वी न्यायालयीन प्रक्रिया, तहसीलदार स्तरावरील सुनावणी, पोलीस ठाण्यात तक्रारी तसेच उपोषण व आत्मदहनाचे निवेदन देण्यात आले होते. तरीही वाद निकाली निघत नव्हता. दि. २०/०२/२०२६ रोजी तहसीलदार सौदागर तांदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे, पोलीस व महसूल कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आली. सुमारे ५ तास सखोल चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत रस्ता व नाली तयार करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
रेणापूर व मुरुड पोलीस ठाण्याच्या या दोन प्रकरणासह या मोहिमेदरम्यान अवघ्या पाच दिवसांत ४९ जमीन व शेती वादांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आल्याचा दावा पोलीस प्रशासनाने एका प्रसिद्ध पत्रकार केला आहे.
नागरिकांना आवाहन
जमीन व शेतीसंदर्भातील वाद असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित (Latur Police) पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा लाभ घ्यावा व सामंजस्याच्या माध्यमातून वाद मिटविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन लातूर पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.