सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या डिजिटल चळवळीने आता राष्ट्रीय राजकारणातही लक्ष वेधून घेतले आहे.
नवी दिल्ली (Political Buzz) : सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या डिजिटल चळवळीने आता राष्ट्रीय राजकारणातही लक्ष वेधून घेतले आहे. तरुणांमध्ये वाढत चाललेली लोकप्रियता, सरकारविरोधातील भावना आणि सोशल मीडियावरील प्रभावामुळे ही ऑनलाइन चळवळ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. अशातच काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याच्या वक्तव्यामुळे नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेस नेते उदित राज यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने काँग्रेससोबत यावे, असे सूचक विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी काळात काँग्रेस आणि या डिजिटल चळवळीमध्ये राजकीय जवळीक वाढणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय होत असलेल्या सीजेपीकडे अनेक जण सरकारविरोधातील असंतोषाचे प्रतीक म्हणून पाहत आहेत. विशेषतः तरुण वर्गामध्ये या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स ही चळवळ डिजिटल आंदोलन असल्याचे सांगत असून, पारंपरिक राजकारणाविरोधातील नाराजीचे ते माध्यम बनत असल्याची चर्चा आहे.
उदित राज यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की, “कॉकरोच जनता पार्टीसारख्या डिजिटल चळवळीला जर वास्तविक राजकीय शक्तीमध्ये रूपांतर करायचे असेल, तर त्यासाठी प्रस्थापित नेतृत्वाची गरज आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व या असंतोषाला संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मोठ्या जनआंदोलनात रूपांतरित करू शकते. ही ऊर्जा विखुरली गेल्यास तिचा प्रभाव कमी होऊ शकतो.”
दरम्यान,तृणमूल काँग्रेस पक्षानेही या डिजिटल चळवळीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमधून अशा डिजिटल आवाजांना गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे सूचित केले. लोकशाहीविषयक मुद्द्यांवर सक्रिय सहभागाला पक्षाचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सोशल मीडियातून सुरू झालेली ही चळवळ प्रत्यक्ष राजकारणात कितपत प्रभाव टाकते आणि आगामी निवडणुकांमध्ये कोणती भूमिका बजावते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.