जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला.
गांदरबल जिल्ह्यातील हरिगनीवन येथे घटना; अमरनाथ यात्रेपूर्वी अपघात, लष्करासह विविध यंत्रणांचे तातडीने बचावकार्य
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. हरिगनीवन परिसरातील एस-मोड वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सुमारे ५० भाविकांना घेऊन जाणारी बस थेट दरीत कोसळली. या दुर्घटनेत ३९ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांदरबलच्या गुंड भागातील एस-मोड, हरिगनीवन वळणावर हा अपघात घडला. बस चालकाचे नियंत्रण अचानक सुटल्याने वाहन रस्त्यावरून घसरत खोल दरीत कोसळले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून घटनेचा तपास सुरू आहे.
दुर्घटनेनंतर पोलिस, बचाव पथके आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सर्व जखमी भाविकांना प्राथमिक उपचारासाठी कांगन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर दुखापत झालेल्या काही यात्रेकरूंना आवश्यकतेनुसार श्रीनगरमधील मोठ्या रुग्णालयात हलविण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
अमरनाथ यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक जम्मू-काश्मीरमध्ये दाखल होत असल्याने संपूर्ण यात्रा मार्गावर लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बस दरीत कोसळल्याची माहिती मिळताच बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले, त्यामुळे जखमींना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविणे शक्य झाले.
या अपघाताची माहिती मिळताच भारतीय लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), भारत-तिबेट सीमा पोलिस (ITBP), जम्मू-काश्मीर पोलिस, यात्रा पोलिस, २ आसाम रायफल्स आणि २१ राष्ट्रीय रायफल्स यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्यात सक्रिय सहभाग घेत जखमींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली. जखमींच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून, यात्रेकरूंनी प्रवासादरम्यान सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.