श्रीराम नवमीच्या निमित्ताने लेख...
(Ram Rajya) ज्या ज्या वेळी रामचरित्रावर भाष्य केले जाते, त्यावेळी रामराज्यावर अधिक चर्चा होत असते. प्रभू श्रीराम हे लोकोत्तरी राजे होते. तत्पूर्वी राजे व्हायच्या आधी एक निष्कलंक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. अयोध्येच्या राजगादीवर बसण्यापूर्वी ते आदर्श विचाराने आणि कृतीने परिपूर्ण होते. आधी स्वतः राम बनले, नंतर राज्यकारभार चालविला. तोही आदर्श ठरला. आदर्श रामाचे राज्य आदर्श ठरले म्हणून ते 'रामराज्य' म्हणून लौकिकास पात्र ठरले. ज्या रामराज्याची आज समाजात आभासी संकल्पना मांडल्या जाते, मुळात त्या पूर्ततेसाठी सर्वप्रथम माणसातला 'राम' जागवावा लागेल. तेव्हाच 'रामराज्य' आकारास येईल असे नाही का वाटत?
करिता समाजाला पुन्हा रामबीजाकडे वळावे लागेल. प्रभू श्रीरामांच्या चरित्राचा बोध घ्यावा लागेल. मुळात प्रभू श्रीरामचंद्रांना राजसत्तेचा मोह नव्हताच. ते त्यांच्या चरित्र आणि कृतीतून स्पष्ट होते. रामचरित्रातूनप्रभू श्रीरामरायांचे गुणवैशिष्ट्ये असे दिसते की, प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आणि आदर्शवान होते. राम शूर, वीर, ज्ञानी त्याचप्रमाणे सत्यवादी, न्यायप्रिय, दयाळू, कृपाळूसुद्धा होते. तर कधी क्रोधीसुद्धा होते; परंतु त्यांचा क्रोध हा कल्याणकारक ठरत होता. ते एकबाणी, एकवचनी, एकपत्नी आणि न्यायनिष्ठेचे आज्ञाधारक पाईक होते. लोकोत्तर पुरुष, लोकोत्तर शिष्य आणि आदर्श धर्मनिष्ठ राजा अशी विशेष ओळख ही रामचरित्रातून श्रीरामचंद्रांची होते. त्यांनी आपल्या जीवनात भावना आणि कर्तव्य यांचा संघर्ष चालत असताना भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्यक्रम देताना दिसले.
ज्यावेळी राजा दशरथ ठरवतात की, आता आपण राज्यकारभार आपल्या ज्येष्ठ पुत्र रामाला सोपवू, त्यावेळी राज्याभिषेकाची पूर्ण तयारी होते, पण ऐनवेळी माता कैकयी ह्या दिलेल्या वचन वचनपूर्तीचा आग्रह करतात. वडिलांनी माता कैकयीला दिलेला वचनांचे पालन करण्याचे प्रभू श्रीरामचंद्र सांगतात. आणि स्वतः राज्याभिषेकाचा मोह त्यागून वडिलांच्या आज्ञापालनार्थ चौदा वर्षांचा वनवास पत्कारतात. वास्तविक ते म्हणू शकले असते की, वडील पाहतील वडिलांचे वचन. मला काय त्याचे? वारसा हक्काने व परंपरेने मीच राजा ठरतो पण नाही, त्यांनी वनवास आनंदाने पत्करला.
पुढे श्रीरामांना दुसरी राजसत्तेची संधी प्राप्त होते. ज्यावेळी भरत मातुलाहून (मामाच्या गावावरून) परत येतात. त्याला सगळा प्रकार कळतो. श्रीरामचंद्र प्रभुंच्या भेटीला येतो व विनंती करतो की, अयोध्येचे राज्य श्रीरामानेच करावे. तेव्हासुद्धा श्रीराम भरताची समजूत काढतात व राजसत्तेचा मोह टाळून वनवास स्वीकारतात. श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरत राज्यकारभार चालवितात.
ज्यावेळी श्रीराम सुग्रीवांची भेट होते, व सुग्रीवांवरील झालेला अन्याय पाहून श्रीराम सुग्रीवास मदतीचे वचन देऊन बालीचा वध करतात. त्यावेळी सुग्रीव आपले राज्य श्रीरामांमुळे प्राप्त झाले असल्यामुळे, त्यावर श्रीरामांचाच हक्क आहे असे सांगतो. त्याप्रसंगी सुग्रीव श्रीरामांना राज्य स्वीकारण्याची विनंती करतो, पण याही वेळी श्रीराम राजसत्तेचा मोह त्यागून किष्किंधाचे राज्य सुग्रीव, अंगदांना बहाल करतात.
पुन्हा एकदा राजसत्तेची संधी श्रीरामांना प्राप्त होते. राम-रावण युद्धानंतर रावणाचा वध होतो. रावण वंशात केवळ बिभीषण उरला असतो. त्यावेळी रावण वध करून श्रीलंकेचे राज्य जिंकल्यामुळे, त्यावर श्रीरामाचा हक्क आहे. अशी विनंती हे बिभीषणही श्रीरामांना करतात, पण याही वेळेस मोह त्यागून श्रीराम लंकेचे राज्य बिभीषणाकडे सन्मानाने सोपवितात. एवढ्या संधी प्राप्त होऊनही राजसत्तेचा मोह प्रभू श्रीरामचंद्रांना झाला नव्हता. खरे ही सर्व राज्यें श्रीरामांची रामराज्यें होती. एकंदरीत प्रभू श्रीरामांचा त्याग बघून ते निर्मोही आदर्श राजे ठरतात. आता अनेक सज्जनांना असा प्रश्न पडला असेल की, हे सर्व काही त्या काळातच झाले. आता हे काही शक्य आहे काय? काळ कुठलाही असो नीतीमूल्यें ही कुठल्याही काळात सारखीच असतात. सध्या दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत जी काही राज्यव्यवस्था आहे. त्यामध्ये 'रामराज्य' आणता येईल; परंतु तेव्हा हे तेव्हाच शक्य होईल ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांच्या वैचारिक आदर्शाचा अवलंब करू !
शशिकांत मधुकर तोटे
दारव्हा, जि. यवतमाळ
मो. नं.-९१३०८३५४५८