Nirmal Wari Adarsha Dindi Award: कुंभारझरी ‘वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित स्वग्राम ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास निर्मल वारी आदर्श दिंडी पुरस्कार २०२६ जाहीर
चिखली (Nirmal Wari Adarsha Dindi Award) : कुंभारझरी येथील ‘वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित स्वग्राम ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास या वर्षीचा श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचा मानाचा "निर्मल वारी आदर्श दिंडी पुरस्कार २०२६" जाहीर झाला आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या सभागृहात आयोजित शानदार सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सौ. अमृताताई फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या (Nirmal Wari Adarsha Dindi Award) सोहळ्यास नामदार गिरीश महाजन, नामदार आकाश फुंडकर, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. औसेकर महाराज, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, ह.भ.प. माधवीताई निगडे, ह.भ.प. देशमुख महाराज आणि ह.भ.प. नडगिरे ताई आदी विश्वस्त व मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार पूजनीय ह.भ.प. सोनूने गुरुजी, सौ. सुमनबाई सोनूने, दिंडीचे विणेकरी ह.भ.प. दिनकर महाराज, प्रतिष्ठानचे विश्वस्त ह.भ.प. शालिकराम पाटील म्हस्के आणि विश्वस्त सुनील वायाळ यांनी स्विकारला.
समाजप्रबोधन अन् शिस्तीचा अनोखा मेळ
राज्य शासनाचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त पूजनीय श्री साळूबा यशवंत सोनूने (सोनूने गुरुजी बाबा) यांनी सेवानिवृत्तीनंतर आपले संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी समर्पित केले आहे. संतांचे विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी त्यांनी ‘वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान’ची स्थापना केली. आज या प्रतिष्ठानमध्ये जाफराबाद, भोकरदन आणि शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ३५ गावे सहभागी आहेत.
प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूर व पैठण पायी दिंडी सोहळा, आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह, भागवत धर्म प्रशिक्षण शिबीर आणि विविध सामाजिक-धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
'फिरती संकष्टी' उपक्रमातून व्यसनमुक्तीची चळवळ
प्रतिष्ठानचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ‘संकष्टी चतुर्थी मंडळा’च्या माध्यमातून राबवला जाणारा फिरती संकष्टी चतुर्थी उपक्रम. या अंतर्गत ज्या गावात कार्यक्रम असतो, तेथे संपूर्ण ग्रामस्वच्छता केली जाते. सडा-रांगोळ्या काढून प्रदक्षिणा व हरिपाठ होतो. कीर्तनानंतर संपूर्ण गाव एकत्र येऊन सहभोजन करते. यावेळी व्यसनमुक्ती, सदाचार व सद्विचाराचा संकल्प केला जातो, ज्यामुळे परिसरातील हजारो नागरिक व्यसनमुक्त जीवन जगत आहेत.
पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध दिंडी
या पायी दिंडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कडक शिस्त, प्लास्टिकमुक्ती आणि स्वच्छता!
एकसारखा वेश व शिस्त: सर्व वारकरी एकाच वेशात, रांगेत चालत अखंड नामस्मरण करतात.
पर्यावरणपूरक वारी: भोजनासाठी प्लास्टिक पत्रावळींऐवजी धातूची ताट-वाट्या आणि ग्लासांचा वापर केला जातो.
स्वच्छता मोहीम: दिंडी मुक्कामाच्या ठिकाणाहून पुढे निघाल्यावर परिसराची पूर्ण स्वच्छता केली जाते.
या (Nirmal Wari Adarsha Dindi Award) पुरस्कारामुळे जालना व बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची मान अभिमानाने उंचावली आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचा आदर्श घेऊन भागवत धर्माची पताका अशीच उंच फडकत राहील, अशी भावना व्यक्त केली जात आहे.