Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आणखी > अध्यात्म

भगवान श्री राम

धर्माचे व साधूजनांचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचा नाश करण्यासाठी देव अवतरित होत असतो.


भगवान श्री राम

Hindu Dharma |

धर्मरक्षणासाठी देवाचा अवतार

(Hindu Dharma) धर्माचे व साधूजनांचे रक्षण करण्यासाठी व दुष्टांचा नाश करण्यासाठी देव अवतरित होत असतो. साम, दाम, दंड व भेद या राजनीतीने ईश्वर क्रांती घडवून आणतो. शांतीअवतार व क्रांती अवतार भू-तलावर होत असतात. शांती अवतार सद्बोधाने परिवर्तन घडवून आणतात तर क्रांती अवतार निर्णय करून परिवर्तन घडवून आणतात. संपूर्ण विश्वाचा देव एकच आहे. कार्य करण्यासाठी त्याने अनंत रूपे घेतली. म्हणून त्याला अनंत हेसुद्धा एक नाव आहे. त्यांची अंनत रूपे व नावे आहेत.

'देव एक असोनि अनंत झाला।
नाना रूपे धरोनि नटला।
परि तो पाहता एकचि दिसला।
कार्य रूपाने 'ग्रामगीता' ।।

असे वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 'ग्रामगीतेत' देव-देवळे या अध्यायात लिहितात. अनंत अवतार जरी असले तरी हिंदुधर्मात मुख्य दहा अवतार मानले जातात. त्यातही राम आणि कृष्ण हे पूर्णावता मानले जातात. त्रेतायुगात श्रीराम अवतार व द्वापार युगात श्रीकृष्णावतार विशेष कार्यासाठी आलेत. त्रेतायुगात रावण व त्याचे पुत्र, भाऊ कुंभकर्ण, अहिमही, वाली, मारीच आदींचा नाश घडवावयाचा होता. रघुकुलातील राजा दशरथाला तीन राण्यांपासून एकही अपत्ये नव्हते. म्हणून ऋषींच्या उपदेशानुसार पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञातून प्राप्त झालेल्या पायसदानाने कौशल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण व कैकयीला भरत व शत्रुघ्न अशी चार मुले झाली. ज्येष्ठ पुत्र श्रीरामाच्या बालपणीचे वर्णन अनेक साधू-संत व कवींनी आपल्या साहित्यातून केलेल आहे.

ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनियाँ'। श्रीरामाचे चालणे, धावणे, बोबडे बोलणे, भावांसोबत खेळणे याचे वर्णन मनमोहक वाटते. 'सावळा गं रामचंद्र माझ्या मांडीवर न्हातो। अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो ।। सावळा ग रामचंद्र चंद नभीचा मागतो.... रात जागवितो बाई, सारा प्रासाद जागतो. अशा कौतुकात चारही भाऊ मोठे होतात. श्रीराम व लक्ष्मण विश्वमित्र ऋषी बरोबर जाऊन लहानपणीच राक्षसांपासून यज्ञाचे रक्षण करतात. गुरूगृही राहून आपला अभ्यास पूर्ण करतात. श्रीरामाने जीवनात अफाट कार्य केले. म्हणून त्यांचा जन्मदिवस 'श्रीरामनवमी' म्हणून चैत्र शुद्ध नवमीला साजरा करतात. श्रीकृष्णाचे चरित्र अभ्यासनीय असे आहे. श्रीरामाचे चरित्र आचरणीय व अनुकरणीय असे आहे. श्रीरामाच्या चरित्रातून आपणास मातृ-पितृ भक्ती, गुरुभक्ती, बंधू-प्रेम, मित्र-प्रेम, एकपत्नी व्रत, आदर्श व न्यायी राजा, भक्तवत्सल पिता, त्यागमूर्ती उत्तम पुरुष, मर्यादा पुरुर्षोत्तम हे गुण प्रामुख्याने दिसून येतात.

पित्याच्या वचनासाठी रामाने वनवास स्वीकारला. कौशल्येइतकेच प्रेम आई सुमित्रा व कैकयीवर केले. त्यांचेही आशीर्वाद घेतले. त्यांना मान दिला. वसिष्ठ मुनी, विश्वमित्र, वाल्किमी ऋषी, आदी ऋषिमुनी तसेच वनवासात अनेक ऋषिमुनींच्या भेटी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. श्रीराम व भरत या बंधुद्वयाचे प्रेम पुराणातील एकमेव उदाहरण ठरले. भरताने रामाप्रमाणे चौदा वर्षे वनवासी जीवन कंठले. श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांच्या नावाने राज्यकारभार चालविला व आदर्श राजा ठरला.

मातंगऋषीच्या आश्रमात जीवनभर सेवा करणाऱ्या व प्रभूची वाट पाहणाऱ्या शबरीभिल्लीनीची मायेने व श्रद्धेपोटी दिलेली उष्टी बोरे खाऊन रामाने तिचा उद्धार केला. पित्याच्या वचनासाठी राज्याचा त्याग केला व नंतर प्रजेच्या मनातील शंका घालविण्यासाठी प्रिय पत्नी सीतेचा त्याग केला. व जनतेला न्याय दिला. बिभीषणाला लंका देऊन लंकेच्या राज्याचा त्याग केला. अशाप्रकारे आदर्श राजा बनून आदर्श राम राज्य स्थापन केले.

वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या अभंगात श्रीरामाचे वर्णन करतात.

सावळा सुंदर अयोध्येचा राजा।
नमस्कार माझा तया कोटी ।।
सत्वगुण मूर्ती अवतार रामाचा।
कैवारी साचार प्रवेशला ।।
भक्ताचिये साठी धरिला अवतार।
काननी साचार प्रवेशला ।।
तुकड्या दास म्हणे मदनाचा पुतळा ।
संहारी कळिकाळा ऋषीस्तव ।।

-
राष्ट्रसंत

अयोध्या नगरीचा राजा श्रीराम सावळा व सुंदर, मनमोहक आहे. माझे त्याला कोटी-कोटी नमस्कार. श्रीरामाचा अवतार सत्वगुणाने परिपूर्ण आहे. भक्तांचा कैवार घेणारा व जीवाभावाचे भक्तांचे रक्षण करणारा हा श्रीराम आहे. भक्तांच्या उध्दारांसाठी व रक्षणासाठी त्याने अवतार घेतला व वनवास पत्करला. वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात- श्रीराम म्हणजे प्रत्यक्ष मदनाचा पुतळा आहे, पण ऋषीमुनींच्या धर्म रक्षणासाठी व सेवेसाठी प्रत्यक्ष कळीकाळाचाही नाश करणारा आहे.

'श्रीरामे शबरीची खादली बोरे।
गृह का आलिंगिले प्रेमभरे।
मित्र केली आदिवासी वानरे। अहिल्येसि उध्दरिले ।।

- ग्रामगीता अयोध्येच्या राजाला श्रीरामाला शत-शत प्रणाम' !

 

रामदास गायकवाड

(ग्रामगीताचार्य)

अमरावती

मो. नं.-९३२५४०९९१९

Related to this topic: