विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तथा राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास नागपूर येथील खामला निवासस्थानी निधन झाले.
विविध क्षेत्रातून शोक व्यक्त
नागपूर (Datta Meghe) : विदर्भातील ज्येष्ठ राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ व समाजसेवक तथा राज्याचे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास नागपूर येथील खामला निवासस्थानी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मेघे यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला होता. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपमध्ये काम करत चार वेळा लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक व वर्धा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय राज्यसभा सदस्य तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. राजकारणासोबतच त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले. 'नगर युवक शिक्षण संस्था'च्या माध्यमातून तसेच 'दत्ता मेघे इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स'सारख्या संस्थांच्या उभारणीतून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्याच्या सुविधा पोहोचविल्या. त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली.
मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही राजकारणात सक्रिय असून पुत्र समीर मेघे आमदार आहेत. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
अंत्यविधी पवनार येथे
आज, दिनांक २३/०३/२०२६ दुपारी ०१.०० वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या स्वगृही पांडे लेआऊट खामला, नागपूर येथील निवास्थानी राहणार आहे. दुपारी ०१.०० वाजता त्यांचे पार्थिव सावंगी मेघे येथे नेण्यात येईल. आणि ०२.३० ते ०४.०० वाजेपर्यंत त्याचे पार्थिव सावंगी (मेघे), वर्धा येथील त्यांच्या निवास्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. ०४.०० वा. त्यांची अंत्ययात्रा पवनार येथील त्यांच्या शेताकडे रवाना होईल आणि तेथे त्यांचे शासकीय इतमानाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राज्यभरातून शोकसंदेशांचा वर्षाव होत आहे. नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आषीश जैस्वाल, पंकज भोयर, आ. चरण ठाकूर, नानाभाऊ पटोले, अभिजित वंजारी जिल्हाधिकारी बिपीन ईटनकर, तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती तसेच सामान्य नागरिकांनी त्यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 'त्यांच्या जाण्याने एक दूरदर्शी आणि जनतेसाठी झटणारा नेता हरपला आहे,' अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यांच्या पश्चात पत्नी श्रीमती शालिनीताई मेघे, माजी आमदार श्री. सागर मेघे, आमदार श्री. समीर मेघे, मुली श्रीमती स्मिता मेघे धारकर आणि श्रीमती संगीता मेघे ग्रोवर व स्नूषा श्रीमती देविकाताई सागर मेघे आणि श्रीमती वृंदाताई समीर मेघे व जावई आणि नातवंडे राधिका, राघव मेघे, रिदीमा मेघे, तसेच असंख्य कार्यकर्ते आणि समर्थक असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी दि. २३/०३/२०२६ रोजी पवनार येथे शासकीय सन्मानाने पार पड़णार आहे. जनतेच्या मनात कायमचे स्थान निर्माण करणारा हा जननेता आज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्यांचे कार्य, विचार आणि समाजासाठीची निष्ठा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.