Vidarbha Cricket Association: तरुणांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जर शिस्त, शिक्षण आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची जोड दिली, तर जीवनात यश निश्चितच मिळते, असा मोलाचा संदेश
वाशिम जिल्हा व ग्रामीण भागातील क्रिकेटच्या विकासासाठी 'विदर्भ क्रिकेट असोसिएशन' कडून मदत मिळवून देणार: जी. ए. सानप यांची ग्वाही
रिसोड येथे रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमीच्या समर कॅम्पचा शानदार निरोप समारंभ; गुणवंत खेळाडूंचा गौरव
रिसोड (Vidarbha Cricket Association) : "तरुणांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जर शिस्त, शिक्षण आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची जोड दिली, तर जीवनात यश निश्चितच मिळते," असा अत्यंत मोलाचा व प्रेरणादायी संदेश महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) चे मुख्य प्रशासक तथा निवृत्त न्यायमूर्ती जी. ए. सानप यांनी दिला. "यासोबतच, ग्रामीण भागातील आणि विशेषतः वाशिम जिल्ह्यातील क्रिकेटला प्रगतीपथावर नेण्यासाठी 'विदर्भ क्रिकेट असोसिएशन' (VCA) कडून आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू," अशी महत्त्वाची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
रिसोड येथील विश्वा लॉन येथे आयोजित रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमीच्या ४५ दिवसीय समर क्रिकेट कॅम्पच्या निरोप समारंभाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांशी अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. विद्यार्थ्यांचे हसतमुखाने स्वागत करत त्यांनी प्रत्येकाचे नाव, गाव, शिक्षण आणि भविष्यातील ध्येयाविषयी आपुलकीने विचारपूस केली. मुंबई उच्च न्यायालयाने असोसिएशनच्या निवडणुकीला स्थगिती दिल्यानंतर, धर्मादाय आयुक्तांनी प्रशासकीय कारभार सुरळीत चालण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती जी. ए. सानप यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

...आम्ही लाकडी फळीने क्रिकेट खेळायचो!
ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले निवृत्त न्यायमूर्ती जी. ए. सानप यांची MCA च्या सर्वोच्च पदावर निवड झाल्याने ग्रामीण भागातील युवा खेळाडूंमध्ये मोठा उत्साह आहे. कार्यक्रमापूर्वी त्यांनी अकॅडमीला प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांना सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की,
"आमच्या वेळी कुठल्याही आधुनिक सुख-सुविधा नव्हत्या. आम्ही बावणे सरांच्या मार्गदर्शनाखाली लेदर आणि कॉर्कच्या चेंडूवर लाकडी फळीने क्रिकेट खेळायचो. आजच्या खेळाडूंनी उपलब्ध सुविधांचा पुरेपूर फायदा उठवून प्रगती करावी."
अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक मयूर तायडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, या समर कॅम्पमध्ये जवळपास १०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या ४५ दिवसांत मुलांना बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि फिटनेसचे उत्तम ट्रेनिंग देण्यात आले. यासाठी विदर्भ स्टेट पॅनल अंपायर व उच्च प्रशिक्षक परेश अग्रवाल, व्ही.सी.ए. महिला प्रशिक्षक श्रद्धा भिंगे आणि दिपाली इंगळे या सर्टिफाईड प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. शिबिरात विद्यार्थ्यांना बॉलिंग मशीन, सिमेंट पीचेस, एस्ट्रो पीचेस आणि ग्रीन मैदान अशा अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रिसोडच्या तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव, विश्वा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष तथा माजी जि. प. सभापती विश्वनाथ सानप, माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष खुशाल पाटील ढोणे, आणि तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मांदळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर व विश्वनाथ सानप यांनी रिसोडच्या उज्ज्वल क्रिकेट भविष्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सांगत विद्यार्थी व पालकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनचा १९ वर्षीय कर्णधार गौरव निकम, तसेच अजय पवार, यश कुलाळ, लाभांश बगडिया, वेदांत रिठे, सम्यक लवंडे, जयदीप इप्पर, आरव पाटकर आणि उत्कर्ष पंचवाटकर या युवा खेळाडूंचा समावेश होता. या शानदार क्रीडा सोहळ्याचे नेटके व अभ्यासपूर्ण संचालन अर्णव जिरवणकर यांनी केले. अकॅडमीच्या या यशस्वी उपक्रमाचे आणि सानप यांनी दिलेल्या आश्वासनाचे रिसोड परिसरातील क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि पालकांकडून भरभरून स्वागत व कौतुक होत आहे.