Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > संपादकीय > लेख

ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांचे निधन

माझ्यासाठी मोठ्या भावासारखे ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांचे निधन

ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांचे निधन झाल्याने नितीन गडकरी यांनी दुःख व्यक्त केले. ते समाजसेवक व शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते.


माझ्यासाठी मोठ्या भावासारखे ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांचे निधन

माझ्यासाठी मोठ्या भावासारखे असलेले ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ मेघे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आठवणींचा पूर माझ्या मनात दाटून आला आहे. अतिशय लाघवी आणि सहयोगी स्वभावाचे व्यक्तिमत्त्व दत्ताभाऊंना लाभले होते. ईश्वराच्या कृपेने त्यांच्या वाट्याला जी काही समृद्धी आली, त्यातील वाटा गरजूंना मिळत राहावा, यासाठी त्यांनी आयुष्यभर धडपड केली. राजकारणात राहूनही अजातशत्रू ठरलेले दत्ताभाऊ हे एक आगळेवेगळे रसायन होते. त्यांच्याशी एकदा जोडली गेलेली व्यक्ती त्यांच्यापासून कधीही दुरावत नसे.

दत्ताभाऊंच्या जीवनाची सुरुवात अतिशय गरीब कुटुंबातून झाली. सी.पी. अँड बेरार कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. उदरनिर्वाहासाठी त्यांनी आईसफ्रूट विकले, तसेच जुन्या पुस्तकांचे दुकानही लावले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केले. ‘युथ कॅडर’ नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. पुढे ते आमदारही झाले. शरद पवार साहेब पुलोदचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत काँग्रेस सोडली. त्यांचा राजकीय प्रवास रोमहर्षक होता. शिवाय, एखादा सामान्य आणि गरीब माणूस आपल्या जीवनात किती मोठे काम करू शकतो, याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते.

लोकांसाठी शक्य ते सर्व करत असताना त्यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली. गोर-गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी सढळ हाताने मदत केली. त्यांच्या दारात गेलेला गरीब माणूस कधीही निराश होऊन परतला नाही. सतत मदत करण्याच्या त्यांच्या दानशूर वृत्तीची तुलना करायची झाली, तर कर्णाशी करावी लागेल. विशेषतः मंत्री असताना, पक्षातील असो वा बाहेरचे असो, त्यांनी सर्वांशी उत्तम व्यवहार ठेवला.

गरिबांबद्दल कळवळा आणि संवेदनशीलता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी कायम लोकांचे हित साधण्याचा प्रयत्न केला. गरिबांची, उपेक्षितांची सेवा केली. राजकीयदृष्ट्या कोणी आपल्या बाजूचा आहे की विरोधातील, याचा विचार न करता त्यांनी सर्वांना मदत केली. त्याच काळात त्यांनी रविनगर सी.पी. अँड बेरार शाळेत फार्मसी कॉलेज सुरू केले. पुढे इंजिनियरिंग आणि मेडिकल कॉलेजही सुरू करून त्यांनी मोठे शैक्षणिक साम्राज्य उभे केले.

दत्ताभाऊंनी राजकारण, शिक्षण, सहकार आणि समाजकारण अशा अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख म्हणजे त्यांची दिलदारी आणि आपुलकी. आयुष्याच्या एका टप्प्यावर ते राजकारणात आले, आमदार, मंत्री, खासदार झाले; परंतु त्यांनी असंख्य माणसांशी जोडलेले नाते कधीही बदलले नाही. संस्थात्मक कार्यात दत्ताभाऊ आघाडीवर होते. त्यांनी शिक्षण संस्थांचे जाळे निर्माण केले. त्यातून शेकडो लोकांना रोजगार मिळाला आणि गरीब-गरजू मुलांच्या शिक्षणाचीही सोय झाली. त्यांच्या संस्था म्हणजे अनेक गरिबांसाठी संधीचे दार होते. कित्येक विद्यार्थ्यांनी मोफत किंवा अल्प शुल्कात शिक्षण घेतले.

दत्ताभाऊंचा स्नेहभाव पक्षातीत होता. त्यामुळेच ते अजातशत्रू ठरले. राजकारणातील त्यांचे विरोधकही एका टप्प्यावर त्यांचे चाहते झाले, ते त्यांच्या लाघवी आणि आपुलकीच्या स्वभावामुळे. विरोधकांशीही त्यांचे संबंध आत्मीयतेचे होते. आपल्यावर टीका करणाऱ्या नेत्यालाही गुपचूप आर्थिक मदत करणारे ते विरळ व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यासाठी माणूस महत्त्वाचा होता, पक्ष नव्हे.

दत्ताभाऊ म्हणजे असंख्य लोकांसाठी आधारवड होते. गेल्या काही वर्षांत आम्ही एकत्र येऊन ‘ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान’चे कार्य सुरू केले होते. त्या कार्याला दत्ताभाऊंचा मोठा आधार होता. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत असे.

ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि समाधानाने जगता यावे, यासाठी आपल्याकडून जे काही शक्य होईल ते करावे, यासाठी त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. शाळेत जाण्याची इच्छा असलेले लहानगे जीव असोत किंवा दुसऱ्या बालपणाचा अनुभव घेत असलेले ज्येष्ठ नागरिक असोत—दत्ताभाऊ असंख्य लोकांचे आधार होते. सतत लोकांची मदत करणाऱ्या अशा माणसांच्या जाण्याने निर्माण होणारी पोकळी कधीही भरून निघत नाही. ती कायम उरते आणि असा माणूस लोकांच्या स्मृतीत चिरंतन स्थान निर्माण करतो.

माझा त्यांच्याशी दीर्घकाळ संपर्क आला. एक सुसंस्कृत राजकारणी, समाजाभिमुख लोकनेता आणि गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे दत्ताभाऊ. माझे आणि त्यांचे मैत्रीचे नाते राजकारणाच्या पलीकडचे होते. आमचे कौटुंबिक ऋणानुबंध होते.

त्यांच्या निधनामुळे आपण मोठ्या भावाला मुकल्याची भावना माझ्या मनात आहे. त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 

नितीन गडकरी
मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग 
भारत सरकार

 

Related to this topic: