Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > संपादकीय > लेख

गुदगुल्या

काया मातीत मातीत... तिफन चालते....ऽऽ!

काय तो कायजाले भीळनारा मातीचा सुगंध, काय ते शेतकऱ्याची धावपय, वावरातली जांभुयवाई, पट्टापास, उभाटीवाई, बी-भरनाची जुळवा-जुळव असं कष्टाच्या अनंदाचं वातावरन आपोआप तयार व्हते!


काया मातीत मातीत 
तिफन चालतेऽऽ

औंदा मिरगात वदरच्या पान्याची वाट पावू-पावू शेतकरी थकला पन अरदळीच्या नक्षत्रात वरुन देवानं हजेरी लावून काया मातीतल्या कष्टाच्या कातोळ्याचा आरंभ झाला! पयल्या पान्याचा माहोल झाल्यावर कष्टाच्या अनंदाले उधान येते! शेतकरी, ढोरं-वासरं, पाखरापासून तं जंगली जनावराले नवी उर्जा भेट्टे! कायी माती पयल्या पान्यात भिजते अन् त्या सुटनाऱ्या सुगंधानं साऱ्याच कष्टकरी जनतेले कष्ट कराची स्फुर्ती येते!
काय तो कायजाले भीळनारा मातीचा सुगंध, काय ते शेतकऱ्याची धावपय, वावरातली जांभुयवाई, पट्टापास, उभाटीवाई, बी-भरनाची जुळवा-जुळव असं कष्टाच्या अनंदाचं वातावरन आपोआप तयार व्हते! वावरातल्या मशागतीचा ‘तितंबा’ अटपल्यावर, पोटभर पानी आलं का पेरनीची धामधुम सुरु व्हते! ‘पेरते व्हा... पेरते व्हा’ अशी देवपाखराची आरोयी आयकल्यावर कायाकुट्ट ढगाईच्या सावलीत, धळाळधुम्म ईजाच्या गळगळाटाच्या अवाजात, राघु-मैयनाच्या कुहूकुहूत..., बैलाच्या गयातल्या कसांडीच्या संगीतात, पोटाशी ओटी बांधून महादेव तिफनीनं काकर काळते अन् पार्बती सरत्यावर बी उन्हारते! पायाले काटा रुतून रगत सांडते, तहान-भुक ईसरुन शेतकरी हिरव्या सपनाची रांगोई काळत हा पेरनीचा ‘कष्टाचा महाउत्सव’ साजरा करते!अशा कष्टाच्या कातोळ्याच्या अनंदात वराळी भाषेचा बापमानुस श्री. विठ्ठल वाघ सरांची कविता-गानं ‘काया मातीत मातीत...’
 आपोआप हरेकाच्या ओठावर येते! कवितेतल्या शब्दा-शब्दात काया मातीतल्या सुख-दु:खाचा, शेतकऱ्याच्या कायजातल्या हिरव्या सपनाचा, बारोमासातल्या हंगामातल्या संकटाईचा व्यथा-वेदनेचा ‘अर्थ’ लपेल हाये! म्हनून हे  कष्टाच्या अनंदाचं गानं अजरामर व्हयेल हाये!
काया मातीत मातीत... तिफन चालते
ईज थयथय नाचते, ढग ढोलं वाजोते
सदाशिव हाकालते, नंदीबैलाच्या जोळीले
संग पार्बती चाले, ओटी बांधून पोटाले
सरीवर सरी येती, माती न्हातीधुती व्हते
कस्तुरीच्या सुवासानं, भुल जीवाले पळते
भुल जीवाले पळते, वाट राघुची पायते
राघु तिफन हानते, मैना वाटुली पायते
काया मातीत... मातीत...
काया ढेकलात डोया, हिरवं सपन पायते
डोया सपन पायते, काटा पायात रुतते
लाल रगत सांडते, हिरवं सपन फुलते...!

गळेहो, अशा हिरव्या सपनात, हेलपाट्यात, निसर्गाच्या चमत्कारात साऱ्या जगाचा ‘बाप’ कष्ट करते पन या बांडबुहाऱ्या सरकारी संकटाच्या ईचुकाट्यानं शेतकऱ्याची जीनगानीची बंडी ‘उलाय’ व्हयेल हाये! जथीतथी शेतकऱ्याले गच्यांडी दिवून त्याच्या सपनाले मातीत घाल्याचं काम, त्याच्याच मताच्या भरोशावर निवळून येल कोन्त्याबी पक्षाचं हेंबाळं सरकार करतेच! खोटे आश्वासनं, कर्जमाफीत अटी-शर्तीची फसवनुक, बेभावाची गपकनी, सोंगाळं आयात-निर्यात धोरन अशा चारीमेरीनं येनाऱ्या संकटाईनं सद्या ‘वावरं वायन म्हंजे गयफासाले जोळ करनं’ हाये! फक्त बुळाखालची खुर्ची टिकोयासाठी हेंबाळं सरकार शेतकऱ्याले गलचेपी दिवून लाळक्या दोस्ताईसाठी जीवाचं रान करते!
निवळनुकीच्या आंधी ‘शेतकऱ्याले चोपळनं अन् सत्ता आल्यावर संकटाच्या खाईत लोटनं’ हा येककलमी कार्यक्रम चालू हाये! आता तं ईच्यामायले नवाच जबरदस्तीचा कुटाना मांडला! जनतेच्या भरोशावर निवळून येल खासदार-आमदाराले करोळोनं ईकत घीवून पक्ष मोठा कराचा अट्टाहास सुरु झाला! खुलेआम सरकारमान्य खरेदी-ईक्रीची नवी ‘दुकानदारी’ जन्माले आली! खासदार-आमदाराले निवळून जनता देते अन् भोपंजी तेईले बजारातल्या कमळाबाईच्या दावनीले बांधतात! शेतकऱ्याच्या कर्जमाफीले पयसा नाई अन् खासदार-आमदाराच्या बजारात लागील तितका पयसा उफनतात? हा कोन्ता उरफाटा धंदा या बेसरम सरकारचा हाये?
लोकशाईच्या वावरात
व्हते सत्तेच्या खुर्चीचं पेरनं?
खोट्या आश्वासनाचं आवतन
व्हते शेतकऱ्याचं मरनं!
कृषिप्रधान देशात
कसं हेंबाळं सरकारी धोरन?
दोस्ताईच्या माथी पयशाचं तोरन,
अन् बळीराजाचं, गयफासानं मरनं?
खासदार-आमदाराची फोळाफोळी
अंदरुन भेव दाखोते ईळीमीळी?
कर्जमाफीच्या अटी-शर्ती लय भारी
कोमात गेलारे बाप शेतकरी?
असा कसा रे ‘ईंडिया’ महान
‘भारत’ देश ठुला गहान?
हमीभावाची नाई ग्यारंटी
रसायनानं माती केली वांजोटी?
जनता कशी झाली रे मेंढरं
खुलेआम बाजिंदा कारभार?
जातीपातीच्या खेयाले भेट्टे अधार
कसा करावं रे बावा कष्टाचा सोंसार?
नाई जनतेचं रायलं घेनं-देनं
राजोटेईनं ईकलं ईमान
भेट्टे आपोआप खुर्चीचं वरदान!
लोकशाईच्या वावरात
कसं हेंबाळं हे सत्तेचं पेरनं...?

 

अरुण मोडक
मो.९८२२५९३९४७ 

Related to this topic: