तरुणांनी देशहितासाठी स्वतःला समर्पित करावे, असे डोभाल म्हणत आहेत. हिटलरही जर्मन तरुणांना असेच शिकवत होता!
दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या ‘जेन-झी’ आंदोलनाने युवकांच्या असंतोषाला व्यासपीठ मिळवून दिले आणि पेपरफुटीच्या प्रश्नावर केंद्र सरकारवर राजकीय दबाव निर्माण केला. या आंदोलनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वैचारिक संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे. आंदोलनाला ‘क्रांती’ म्हणावे की मर्यादित उद्दिष्टासाठी उभा राहिलेला दबावगट, यावर मतभेद असले तरी त्याने युवावर्गाच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. विशेषतः या आंदोलनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने युवकांशी संवाद वाढविण्यासाठी केलेल्या हालचालींमुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. युवकांना आपल्या विचारविश्वाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न उपस्थित होत असून, याच पार्श्वभूमीवर लेखकाने संघाच्या भूमिकेचे आणि बदलत्या राजकीय वातावरणाचे विश्लेषण केले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नावाखाली झालेल्या जेन झी आंदोलनाने सत्तांधांना झुकवले. नीट पेपर फूट प्रकरण युवकांनी लावून धरले. धर्मेंद्र प्रधान यांना गेल्या २५ जुलैरोजी केंद्रीय शिक्षण मंत्रिपद सोडावे लागले. यावर आतापर्यंत खूप सारे लिहिल्या गेले. सोशल मीडिया गाजवण्यात आले. या आंदोलनाला “जेन झी क्रांती” असेही संबोधण्यात आले. क्रांतीचे निकष या आंदोलनाला लागू पडतात काय? या प्रश्नाने काही तत्त्व अस्वस्थ होतील. आमचा नाईलाज आहे.
मुळासकट परिवर्तनाची क्षमता क्रांतीत असते. दिल्लीतील युवा आंदोलनाचे लक्ष्य मर्यादित होते. त्यामुळे दबावाखाली का असेना, प्रधानांचा राजीनामा स्वीकारत सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची संकटातून सुटका करून घेतली. कोणत्याही दडपणाखाली झुकायचे नाही, ही निरंकुश सत्तेची मानसिकता अंगी भिनलेल्यांना संविधानाची प्रत हातात घेतलेल्या युवकांनी जमिनीवर आणले. या आंदोलनाने युवा वर्गाचा असंतोष, खदखद आणि त्यांच्या दृढ निश्चयाची जाणीव नव्याने झाली.
संविधानाची प्रत हातात ठेवून प्रस्थापित लोकशाही जपण्याची वचनबद्धता व्यक्त करणारे सगळेच जण प्रस्थापित सरकारच्या दृष्टीने वैचारिक शत्रू आणि राष्ट्रद्रोही ठरविले जातात. दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्यांवर “कम्युनिस्ट आणि डाव्या विचारसरणीचे” असा ठप्पा मारण्यात आला. “कथित पुरोगामी” असेही विशेषण वापरण्यात आले. ही शब्दयोजना करणारे आपोआपच संविधानविरोधी, प्रतिगामी आणि उजव्या विचारसरणीचे सिद्ध होतात.
भारतात सरकारी नोंदणी नसलेली ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ‘ (आरएसएस) ही संघटना उजव्यांची जननी आहे. या संघटनेला दिल्लीतील जेन झी आंदोलनाने कामाला लावले आहे. तरुणांना आकर्षून घेण्यावर ही संघटना भर देत आहे. उद्या, सहा ऑगस्ट रोजी मुंबईत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ‘जेन-झी’ आणि ‘जेन-अल्फा’ या १५ ते १९ वयोगटातील, देशभरातील शंभर शहरातील दोन हजार विद्यार्थ्यांशी ‘भारतीय मूल्यांच्या आधारे वैश्विक एकात्मता साध्य करण्यात युवकांची भूमिका’ या विषयावर संवाद साधणार आहेत. ‘इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनाइट नेशन्स’च्या (आयआयएमयूएन) या संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक अजिंक्यपद (चॅम्पियनशिप) परिषदेत हा संवाद होणार आहे.
संघाच्या मुशीत घडलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम शनिवारी, एक ऑगस्ट रोजी झाला. ‘ आज भारत सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर चालतो आहे. आता या मार्गावरून देशाला कोणीही मागे फिरवू शकत नाही. तरुण पिढीने ‘गीता रहस्य’ वाचून टिळकांचे विचार समजून घ्यावेत, म्हणजे चूक होणार नाही,’ असे आवाहन या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
वरील कार्यक्रमात डोभाल म्हणाले, ‘देशाच्या हितासाठी तरुण वर्गाने स्वतःला समर्पित केले पाहिजे. मी केवळ राष्ट्रहितासाठीच काम करीन, छोटे-मोठे वैयक्तिक हितसंबंध असले, तरीही मी त्याकडे दुर्लक्ष करीन, अशी भूमिका घेतली ‘पाहिजे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वतःच्या इच्छेने किंवा मनात येईल ते करणे नव्हे! देशहित महत्त्वाचे.’
मुंबईत आयोजित परिषदेत बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षण संस्कृती उत्थान न्यासाचे राष्ट्रीय सह-संयोजक डॉ. राजेश्वर कुमार पाराशर म्हणाले,
जंतरमंतरवरील आंदोलनातील भाषेवरून “संपूर्ण जेन-झी” चे मूल्यमापन करणे चुकीचे असून ती मूठभर अशा भ्रमितांची भाषा आहे.
वरील नेत्यांची विधाने काळजीपूर्वक वाचल्यास भारतातील प्रस्थापित सरकारची वाटचाल स्पष्ट होते. निरंकुश सत्ताधीश हिटलरने “आर्य वंश जगात सर्वश्रेष्ठ आहे”, असा नारा देत जर्मनांच्या स्वाभिमानाला आणि राष्ट्रवादाला जागवले होते. त्याच आधारे त्याने दुसरे महायुद्ध पेटवले आणि जर्मनीला अंधारात ढकलले. हिटलरचा आदर्श भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आचरणात आणते. देश सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गावर चालत आहे, असे शाह सांगत आहेत.
भारतात संविधानाने धर्मनिरपेक्षता सांगितलेली असताना वाटचालीसाठी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा मार्ग कसा? हिंदीतील प्रसिद्ध व्यंग कवी संपत सरल यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास
“मूर्तिंया आकाश छू रही हैं और प्रजातंत्र रसातल में जा रहा है”।
दिन-रात झूठ बोलने वाले ‘हरिश्चंद्र अवार्ड’ से पुरस्कृत किए जा रहे हैं ।
तरुणांनी देशहितासाठी स्वतःला समर्पित करावे, असे डोभाल म्हणत आहेत. हिटलरही जर्मन तरुणांना असेच शिकवत होता!
जंतरमंतरवरील आंदोलन हे संपूर्ण युवा पिढीचे आंदोलन नव्हते, असे संघाची एक शाखा सांगत आहे. हे सत्यच आहे. उजव्या विचारसरणीचा युवा वर्ग या आंदोलनापासून दूरच राहिला. तथापि, एक अन्य युवावर्गदेखील सत्तेच्या विरोधात असणे धोक्याचे आहे, याची जाणीव झाली असल्याने संघ कामाला लागला आहे. युवकांना आपलेसे करून घेण्यासाठी संघ सरसावला आहे; परंतु...”आम्हाला महात्मा गांधींचा वारसा लाभला आहे” असे काक्रोच जनता पार्टी संस्थापक अभिजित दिपकेने जगाला ठणकावले आहे. आमचे आकलन असे की, गांधीजींच्या मारेकऱ्यांची बाजू घेणाऱ्यांना, हिटलरचे आदर्श बाळगणाऱ्यांना जंतरमंतरवरील आंदोलन पचनी पडणे नाही. ‘संपूर्ण युवावर्गा’ला कवेत घेण्यासाठी संघाच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी गांधीजींचा वारसा कसा संपवणार? या आंदोलनाने संघाला काम दिले आहे...!
प्रभाकर कोंडबत्तुनवार
मो. ९४०५७५०४६०
( प्रस्तुत लेखक प्रसिद्ध पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक आहेत )