पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. अर्थात दोन्ही मतदारसंघात निकाल काय येणार हे सर्वविदितच होते आणि अपेक्षेप्रमाणे दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले. बारामतीत अजितदादांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्राताईंनी उभे राहण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी ही निवडणूक अगदीच एकतर्फी होईल, हे स्पष्ट झाले होते. त्यातच राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी या ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. स्वत: शरद पवारांनी पत्रक काढून बारामतीच्या मतदारांना सुनेत्राताईंना विजयी करण्याचे आवाहन केले. काँग्रेसने सुरुवातीला उमेदवार देण्याचे ठरविले; परंतु शेवटच्या क्षणी काँग्रेसनेही माघार घेतली. उर्वरित अपक्ष उमेदवारांपैकी कुणीही आव्हान देण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे उत्सुकता केवळ मताधिक्क्याची आणि अपेक्षित विक्रमाची होती. तो अपेक्षित विक्रम सुनेत्राताईंनी प्रस्थापित केला. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशात सर्वाधिक म्हणजे दोन लाख १८ हजार ३४ इतक्या प्रचंड मताधिक्क्याने विजयी होण्याचा विक्रम आता सुनेत्राताईंच्या नावे झाला आहे. राहुरीच्या पोटनिवडणुकीतही विजयाची औपचारिकता तेवढी बाकी होती. अर्थात राहुरीमध्ये शरद पवार गटाने आपला उमेदवार दिला होता. संभाव्य उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर शरद पवार गटाने गोविंद मोकाटे यांना मैदानात उतरविले. शरद पवार गटाने मोकाटेंना उमेदवारी तर दिली; परंतु खासदार नीलेश लंके व्यतिरिक्त अन्य कुणीही बडा नेता त्यांच्या प्रचाराला फिरकला नाही. सुनेत्राताईंसाठी पत्रक काढणार्या शरद पवारांनी राहुरीच्या मतदारांना मोकाटे यांना विजयी करण्याचे साधे आवाहनही केले नाही. परिणामी ही लढतही एकतर्फी झाली. गोविंद मोकाटेंसह उर्वरित सगळ्याच उमेदवारांची जमानत जप्त झाली.