मुंबई (Shiv Sena meeting) : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या सायंकाळी होणार असून, त्यात पक्षातील विविध विषयांवर सखोल चर्चा अपेक्षित आहे. विशेषतः विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या दोन उमेदवारांची नावे अंतिम करण्याबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीत पक्षातील नाराजी, काही नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि संघटनात्मक मुद्द्यांवरही भूमिका स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यांवरही चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.
ही बैठक उद्या संध्याकाळी ‘नंदनवन’ या निवासस्थानी पार पडणार असून, पक्षातील प्रमुख नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विधानपरिषद निवडणूक हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असेल.
महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी 9 जागांची निवडणूक पार पडली असून, एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे शिवसेनेला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. सध्या पक्षाकडे 57 आमदार असल्याने दोन्ही उमेदवार विजयी होऊ शकतात. त्यामुळे शिंदे कोणाला उमेदवारी देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या उमेदवारीला विरोध करणारे एक पत्र पुण्यातून व्हायरल झाले होते. तर बच्चू कडू यांना उमेदवारी द्यायची असल्यास त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवसेनेत विलीनीकरण व्हावे, अशी मागणी काही नेत्यांकडून करण्यात आली होती.
दुसरीकडे, आमदार संजय गायकवाड हे विविध कारणांमुळे सतत चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याची घटना समोर आली होती. तसेच अलीकडेच त्यांनी कोल्हापूरमधील प्रशांत अंबी यांना फोनवरून केलेल्या वक्तव्यांमुळेही वाद निर्माण झाला होता. या सर्व घडामोडींवर शिंदे बैठकीत काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.