फाईल एपस्टिन उघडल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. अनेकांची सत्ता गेली.
फेरफटका
(Political Controversy) फाईल एपस्टिन उघडल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. अनेकांची सत्ता गेली. या फाईलमध्ये भारतातीलही काही लोकांची नावे असल्याची चर्चा सुरू झाली. ही चर्चा सुरू असतानाच व मुंबईत उन्हाळी अधिवेशन सुरू असतानाच भोंदूबाबा अशोक खरात यांची फाईल उघड झाली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भयंकर वादळ उठले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. हे बिनबुडाचे आरोप आहेत, असे त्या आता म्हणू लागल्या आहेत. खरातच्या फाईलमध्ये सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षातील प्रतिभावान, प्रतिष्ठावान राजकीय नेत्यांसोबत आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. प्रतिभा आणि प्रतिष्ठा असल्यानेच काही लोकांची नावे अजूनपर्यंत उघड झाली नाही. इकडे मुख्यमंत्री म्हणतात, कुणालाच सोडणार नाही. विशेष म्हणजे, खरातसोबत मुख्यमंत्र्यांचेही फोटो आहेत. पण, फोटो असले म्हणजे, गुन्हेगार ठरत नाहीत, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री स्वतः देतात. या वक्तव्यावरून मुख्यमंत्री कुणाला पाठीशी तर घालत नाही ना? असा संशय बळावतो. अशोक खरात फाईलचे चर्वितचर्वण सुरू असतानाच राज्याचे अन्न व पुरवठामंत्री नरहरी झिरवळ यांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अन् सामान्य नागरिकांसमोर कुणावर विश्वास ठेवावा, असा शंकास्पद प्रश्न निर्माण झाला. कारण अश्लील प्रकरणात आतापर्यंत जी नावे उघड झाली, त्यामध्ये प्रतिभावान आणि प्रतिष्ठावान राजकीय नेत्यांचाच समावेश आहे. प्रतिभा आणि प्रतिष्ठा होती म्हणूनच तुम्ही त्या पदापर्यंत पोहोचले, असे म्हणावयास हरकत नाही.
राजकारण
ही सर्व मंडळी कायदे बनवणारी व त्याचे करणारी पालन आहे. त्यामुळेयातून वाचवण्यासाठी कायद्याला हवे तसे वाकवू शकाल. कदाचित त्यातून तुम्ही सहिसलामतही सुटू शकाल. परंतु तुमची सामाजिक प्रतिमा डागाळली आहे, त्याला कसे स्वच्छ करणार? समाज हा अलिखित नियम व कायद्यांवर चालतो. तुमची प्रतिमा चांगली असेल तर समाजात प्रतिष्ठा निर्माण होते. फाईलमध्ये नावे उघड झालेले चेहरे समाजाच्या नजरेत तुच्छ ठरले आहेत. ही प्रतिमा कोणत्याही वॉशिंग मशीनने स्वच्छ होणार नाही. तुम्ही पुढे पुन्हा विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका कदाचित जिंकू शकाल, पण तुमच्या चारित्र्यावर लागलेले कलंक मात्र मिटवू शकणार नाही. राजकीय प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी हे प्रकार मुद्दामहून उघडकीस आणले जात असल्याचा बचावात्मक पवित्रा आता घेतला जाईल. सत्तेत असल्याने अनेकांच्या दोषांवर पांघरूण घातले आहेत. हे पांघरूण बाहेर काढले की अनेकांची खरी प्रतिमा उघड होण्यास वेळ लागणार नाही. असो, कालाय तस्मै नमः
सुनील तिजारे