Asoda Flyover Damage Case: राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी
ठेकेदार काळा यादीत; खा. स्मिता वाघ यांच्या भेटीतील निर्णय
जळगावातील चार महत्त्वाच्या चौकांवरील उड्डाणपूल व VUP प्रस्तावालाही सकारात्मक प्रतिसाद
जळगाव (Asoda Flyover Damage Case) : राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट (काळ्या यादीत) टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
असोदा उड्डाणपूल खचल्याची घटना (Asoda Flyover Damage Case) घडल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेत नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली दरम्यान, या दुर्घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार राजूमामा भोळे, जळगावचे महापौर दीपमाला काळे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार वाघ यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेत संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
तसेच खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दाही केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर प्रभावीपणे मांडला. शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौक तसेच नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर मार्गावर उड्डाणपूल अथवा व्हेईक्युलर अंडरपास (VUP) उभारण्याची मागणी त्यांनी केली. या प्रस्तावांनाही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, अपघातांना आळा बसण्यास आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
वाहतुकीचे आधुनिकीकरण करणे गरजेचे- खासदार स्मिता वाघ
याबाबत खासदार स्मिता उदय वाघ म्हणाल्या, "जळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहील."