महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून भारत निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे.
मुंबई (Election Update) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून भारत निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान पार पडणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदानाची प्रक्रिया होईल. विशेष म्हणजे मतदान झाल्याच दिवशी निकाल देखील जाहीर केला जाणार आहे.
विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपुष्टात येणार आहे. विद्यमान राजकीय समीकरणे आणि विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 13 मते असल्याने महायुतीने आणखी उमेदवार रिंगणात उतरवले तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, विधान परिषदेतील खालील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे – उद्धव ठाकरे (शिवसेना-उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी-शरद पवार गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी-अजित पवार गट), गोपीचंद पडळकर (भाजप), रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप), राजेश राठोड (काँग्रेस), प्रवीण दटके (भाजप) आणि रमेश कराड (भाजप).
विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. सध्याच्या परिस्थितीत महायुतीकडे भक्कम बहुमत असल्याने त्यांचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. महायुतीत भाजपचे 131, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 40 आमदार आहेत. याशिवाय काही लहान पक्ष व अपक्ष आमदारांचे समर्थनही त्यांना मिळू शकते.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 49 इतके असून त्यांचा एक उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतो. मात्र दुसऱ्या जागेसाठी त्यांना अतिरिक्त 10 मतांची आवश्यकता भासणार असून सध्याच्या घडीला ही गणिते जुळवणे कठीण मानले जात आहे.
विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळाचा विचार केला असता भाजपकडे 131, शिवसेना (शिंदे गट) 57, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 40, काँग्रेस 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 आणि शिवसेना (ठाकरे गट) 20 आमदार आहेत. तसेच समाजवादी पक्ष, जनसुराज्य शक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, एमआयएम, सीपीआय (एम), पीडब्ल्यूपीआय यांसारख्या पक्षांसह काही अपक्ष आमदारांचाही समावेश आहे.
एकूणच, विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे पारडे जड असून या निवडणुकीत त्यांना स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता आहे. मात्र अतिरिक्त उमेदवारी दिल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.