Tiranga Yatra: भाजप आणि महायुतीकडून राज्यात काढण्यात येत असलेल्या तिरंगा यात्रेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली. स्वातंत्र्यलढ्यात योगदान नसलेल्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक
मुंबई (Tiranga Yatra) : भाजप आणि महायुतीकडून राज्यात काढण्यात येत असलेल्या तिरंगा यात्रेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी टीका केली. स्वातंत्र्यलढ्यात योगदान नसलेल्या भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता तिरंगा यात्रेची (Tiranga Yatra) आठवण होत असल्याचे सांगत, या उपक्रमामागे राजकीय स्वार्थ नसावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी मुंबईत आले असताना सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.
स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग आणि तिरंग्याशी संबंधित ऐतिहासिक भूमिकेचा संदर्भ देत सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी भाजप आणि संघावर निशाणा साधला. संघाच्या मुख्यालयावर पूर्वी तिरंगा फडकवला गेला नसल्याचा उल्लेख करून त्यांनी भाजपच्या राष्ट्रवादाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. मात्र, आता तिरंगा यात्रा (Tiranga Yatra) काढली जात असेल तर उशिरा का होईना, ही चांगली बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मुख्यमंत्री या (Tiranga Yatra) यात्रेत सहभागी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना या उपक्रमामागे राजकीय हेतू किंवा कावा नसावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तिरंगा हा देशाच्या एकतेचे आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक असल्याने त्याचा राजकीय वापर टाळला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतल्याबाबतही सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असल्याने खासदारांनी त्यांची भेट घेण्यात गैर काही नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, पंतप्रधान काही नेत्यांना भेटतात आणि काहींना भेटत नाहीत, त्यामुळे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचेही ते म्हणाले.