Hingoli Crime: हिंगोलीत विवाह सोहळ्यात नवरदेवाच्या बुटावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना घडली. चार जणांवर गुन्हा दाखल.
हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
खानापूर चित्ता (Hingoli Crime) : हिंगोली तालु्क्यातील खानापूर चित्ता पासून जवळच असलेल्या कळमकोंडा येथे विवाह सोहळ्यात नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना घडली आहे.
या (Hingoli Crime) घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारसाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी २८ एप्रिल रोजी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे दोन दिवसांपुर्वी विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये वसमत तालुक्यातील गिरगाव ये्थील काही वर्हाडी मंडळी विवाह सोहळ्यासाठी आली होती. यावेळी विवाह सोहळा सुरळीत पार पडत असतांना नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणावरून काही वर्हाडी मंडळीमध्ये वादाला तोंड फुटले होते. मात्र इतर मंडळींनी समजावून सांगितल्यानंतर वाद मिटला होता. त्यानंतर विवाह सोहळा पार पडला.मात्र बुट लपविण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून चौघांनी पुन्हा वाद उकरून काढत गणेश डाळ यांना मारहाण करण्यास सुरवात केली.
या मारहाणीमध्ये त्यांच्या पोटात खंजीरने वार करून गंभीर जखमी केले. त्यामुळे ते खाली पडले. सदर प्रकार सोडविण्यासाठी श्रावण गाढवे हे मध्ये पडले असता चौघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याही पोटात खंजरने वार करून जिवे मारण्याची प्रयत्न केला.यावेळी झालेल्या मारहाणीमध्ये गजानन, श्रावण यांच्यासह मारहाण करणारे विष्णू कुंभारकर, प्रभू बारसे हे जखमी झाले. गावकर्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.या प्रकरणी श्रावण गाढवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी विष्णू कुंभारकर, प्रभू बारसे व अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुगे, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, जमादार अनिल राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. उपनिरीक्षक राहुल घुले पुढील तपास करीत आहेत.