स्थानिक गुन्हे शाखेची थातूर-मातूर कारवाई; वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज
हिंगोली (Hingoli Police Action) : हिंगोली - नांदेड परिक्षेत्रात राबविण्यात आलेल्या महिनाभराच्या अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिमेत नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यांनी दमदार कामगिरी करत कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत केला असताना हिंगोली जिल्ह्याची कामगिरी मात्र या तुलनेत अत्यंत फिक्की आणि निराशाजनक राहिली असून या अपयशाचे खापर थेट स्थानिक गुन्हे शाखेच्या निष्क्रियतेवर फोडले जात आहे.
परिक्षेत्राच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे चित्र अधिक स्पष्ट होते. गुटखा तस्करी विरोधात नांदेड जिल्ह्यात १९ गुन्ह्यांमध्ये ३५ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर परभणीत केवळ ६ गुन्ह्यांमध्ये ३२ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. त्याच तुलनेत हिंगोलीतही ६ गुन्हे दाखल झाले असले तरी जप्त मुद्देमाल केवळ १४ लाख १८ हजार इतकाच आहे, जो परिक्षेत्रात सर्वात कमी आहे. म्हणजे मोठ्या तस्करांपर्यंत हात न पोहोचवता केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून आकडेवारी पूर्ण करण्यात आली.
याच प्रकारे मटका जुगाराच्या कारवाईत लातूर जिल्ह्याने ९२ गुन्ह्यांमध्ये ९१ लाख ७० हजारांचा तर परभणीने १२६ गुन्ह्यांमध्ये ७६ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र हिंगोलीत ७१ गुन्हे दाखल होऊनही केवळ १५ लाख ६ हजारांचाच मुद्देमाल जप्त झाला, जो इतर तीन जिल्ह्यांच्या तुलनेत पाचपट कमी आहे. दारूबंदी कारवाईतही परभणीने ३७ लाख ५५ हजारांची कारवाई केली असताना हिंगोलीत २२० गुन्ह्यांमध्ये केवळ १२ लाख ६८ हजारांचीच कारवाई झाली.
सर्वात गंभीर बाब म्हणजे शस्त्र अधिनियमाखाली नांदेड जिल्ह्यात १७ लाख ४४ हजार आणि परभणीत ३ गुन्ह्यांमध्ये ११ लाख ५४ हजार रुपयांची शस्त्रे जप्त झाली, तर हिंगोलीत १४ गुन्ह्यांमध्ये केवळ ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल दाखवण्यात आला आहे. हे आकडे हिंगोलीतील अवैध शस्त्र तस्करीवर कोणताही वचक नसल्याचे दर्शवतात.
या संपूर्ण मोहिमेत हिंगोलीतील पोलीस ठाणे (Hingoli Police Action) स्तरावर दारू आणि जुगारावर दमदार कारवाई झाल्याचे दिसून येत असले तरी संघटित गुन्हेगारी आणि मोठ्या नेटवर्कवर प्रहार करणे अपेक्षित असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मात्र अत्यंत थातूरमातूर कारवाई केली आहे. जिल्ह्याची माहिती असूनही मोठे अड्डे आणि तस्करांचे जाळे जसेच्या तसे ठेवून केवळ ठाणे स्तरावरील कारवाईच्या जीवावर आपली आकडेवारी वाढवण्याचे काम थ्ण्ँ ने केले असून त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हिंगोलीची एकूण कामगिरी परिक्षेत्रात सर्वात तळाला गेली आहे.
विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राबविलेल्या अवैध व्यवसाय निर्मुलन मोहिमेत पोलिस ठाणे स्तरावर दमदार कारवाई झाली आहे. या मोहीमेचा कणा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत मात्र थातूर-मातूर आणि केवळ आकडेवारी पुर्ततेसाठी कारवाई झाली असल्याने याकडे वरिष्ठांनी गांर्भीयाने लक्ष घालणे गरजेचे असल्याचे नागरीकातून बोलले जात आहे.