Hingoli Bazar Samiti: हिंगोलीत अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हळद भिजल्यामुळे आक्रमक झाले. बाजार समितीच्या लिलाव प्रक्रियेत व्यत्यय आला आणि शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
हिंगोली (Hingoli Bazar Samiti) : "पिवळ्या सोन्याचा जिल्हा" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंगोलीत आज शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला. मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणलेली शेतकऱ्यांची हळद पूर्णतः भिजल्याने मोठे नुकसान झाले. बाजार समितीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका बसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज सकाळी बाजार समितीवर धडक दिली.
"शेतकऱ्यांची हळद काळी झाली" असा निषेध नोंदवत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला काळे फासले. त्यानंतर शेकडो संतप्त शेतकरी बाजार समितीच्या आवारात दाखल झाले आणि त्यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली. हळदीचे दर घसरल्याने आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना खरेदीतील विलंब आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीने अधिकच संतप्त केले.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी व (Hingoli Bazar Samiti) बाजार समितीचे सचिव संपत मुंडे व माजी सचिव नारायण पाटील यांनी मध्यस्थी केली. शेतकऱ्यांची हळद योग्य दराने खरेदी केली जाईल, खरेदी प्रक्रियेस विलंब होणार नाही आणि भविष्यात शेतकऱ्यांचा माल भिजणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले व लिलाव प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
या (Hingoli Bazar Samiti) आंदोलनाचे नेतृत्व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, तालुका अध्यक्ष प्रवीण मते, चैतन्य चव्हाण, सखाराम भाकरे, विठ्ठल वायचाळ, राम चव्हाण, संतोष सावके, संदीप पाटील, मनोहर पाटील, अशोकराव जयस्वाल, विशाल पोळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.