Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > देश

Sea Level Rise

मुंबई-कोलकाता बुडण्याचा धोका? UN चा गंभीर इशारा; ७७ कोटी लोकांवर संकट

जागतिक तापमानवाढीचा परिणाम आता किनारपट्टीवरील शहरांसाठी अधिक गंभीर होताना दिसत आहे.


मुंबई-कोलकाता बुडण्याचा धोका un चा गंभीर इशारा ७७ कोटी लोकांवर संकट

Sea Level Rise |

जागतिक तापमानवाढीचा गंभीर परिणाम; २०२४ मध्ये समुद्रपातळी वाढीचा नवा विक्रम, UN अहवालातून धोक्याचा इशारा

जागतिक तापमानवाढीचा परिणाम आता किनारपट्टीवरील शहरांसाठी अधिक गंभीर होताना दिसत आहे. समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वेगवान वाढीमुळे भारतातील मुंबई आणि कोलकाता या प्रमुख शहरांवर मोठे संकट ओढावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांचे (UN) सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी समुद्रपातळी वाढीच्या धोक्याबाबत जगासह भारतालाही गंभीर इशारा दिला आहे. मुंबई आणि कोलकाता येथील १० दशलक्षांहून अधिक नागरिकांना भविष्यात आपली घरे कायमची गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, हवामान बदलामुळे हिमनद्या आणि बर्फाचे साठे वेगाने वितळत आहेत. त्याचवेळी महासागरांचे तापमान वाढत असल्याने समुद्राच्या पाण्याची पातळीही पूर्वीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे. या बदलाचा थेट परिणाम जगभरातील किनारपट्टीवरील शहरांवर होत असून, नागरिकांचे जीवन, उपजीविका आणि अत्यावश्यक पायाभूत सुविधा धोक्यात येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

UN च्या अहवालात मुंबई-कोलकात्याबाबत काय इशारा?

सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांचा ‘समुद्र पातळी वाढीशी संबंधित आव्हाने आणि त्यावर उपाययोजना’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात वाढत्या समुद्रपातळीमुळे मुंबई आणि कोलकात्यासारख्या किनारपट्टीवरील शहरांसमोर निर्माण होणाऱ्या धोक्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यास केवळ निवासी भागांनाच फटका बसणार नाही, तर दोन्ही शहरांमधील रस्ते, विमानतळ, विविध पायाभूत सुविधा आणि अब्जावधी रुपयांची मालमत्ताही पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊन आर्थिक संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. समुद्रपातळीतील दीर्घकालीन वाढीमुळे विकास आणि आर्थिक स्थैर्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुंबई-कोलकात्यातील लाखो नागरिक धोक्यात

किनारपट्टीवरील भागांमध्ये समुद्राची पातळी वाढत राहिल्यास मुंबई आणि कोलकाता येथील मोठ्या लोकसंख्येला स्थलांतराची वेळ येऊ शकते. १० दशलक्षांहून अधिक लोकांना आपली घरे कायमची गमावण्याचा धोका असल्याचे अहवालातील इशाऱ्यातून समोर आले आहे.

जगातील अनेक किनारी शहरांमध्ये समुद्रपातळी वाढीचे परिणाम आधीपासूनच जाणवत आहेत. वाढता पूर, पायाभूत सुविधांचे नुकसान आणि उपजीविकेवर होणारा परिणाम यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांसमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत.

अमेरिकेतील शहरांनाही मोठा फटका

समुद्रपातळीतील वाढ आणि भूस्खलनाचा परिणाम केवळ भारतापुरता मर्यादित राहणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, मियामी, न्यूयॉर्क आणि ग्वांगझू यांसारख्या शहरांमधील किनारी पायाभूत सुविधांना २ ते ३.५ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सचा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

याशिवाय पुराचा धोका वाढल्याने जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान, उपजीविकेवर परिणाम आणि जल परिसंस्थांना धोका निर्माण होत आहे. स्वच्छता व्यवस्थेतील पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्यास पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्याचा सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याबरोबरच मृत्यू आणि मानसिक त्रासाच्या घटनांमध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

समुद्रपातळी वाढीचा वेग चिंताजनक

अहवालानुसार समुद्राच्या पातळीत होणारी वाढ ही प्रामुख्याने मानवनिर्मित जागतिक तापमानवाढीशी संबंधित आहे. वाढत्या तापमानामुळे हिमनद्या वितळत असून महासागर अधिक उष्ण होत आहेत.

२०१४ ते २०२३ या कालावधीत समुद्राच्या पातळीत दरवर्षी सरासरी ४.७ मिमी वाढ झाली. मात्र, २०२४ मध्ये ही वाढ ५.९ मिमी इतकी नोंदवली गेली. हा समुद्रपातळी वाढीचा नवा विक्रम ठरला आहे. काही भागांमध्ये महासागराचे तापमान गेल्या ४,००० वर्षांतील सर्वाधिक वेगाने वाढल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२०५० पर्यंत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता

समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचा वेग २०५० पर्यंत आणखी वाढण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. जगातील सुमारे १० टक्के लोकसंख्या, म्हणजे जवळपास ७७ कोटी नागरिक, किनारपट्टीच्या भागात वास्तव्यास आहेत. त्यामुळे समुद्रपातळीतील वाढीचा परिणाम मोठ्या लोकसंख्येवर होण्याची शक्यता असून, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या शहरांसाठी हा इशारा विशेष महत्त्वाचा ठरत आहे.

Related to this topic: