गुजरातमधील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ झालेल्या भीषण एसटी बस अपघातानंतर हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बारडोली (Bardoli Bus Accident) : गुजरातमधील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ झालेल्या भीषण एसटी बस अपघातानंतर हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघाताला 18 तासांहून अधिक काळ उलटूनही अनेक कुटुंबीय आपल्या नातेवाईकांच्या शोधात रुग्णालये आणि शवागाराबाहेर हेलपाटे मारताना दिसत आहेत. "आमचे नातेवाईक कुठे आहेत? ते जिवंत आहेत की मृत?" असा आक्रोश करत नातेवाईक प्रशासनाकडे माहितीची मागणी करत आहेत.
या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी केवळ एका मृतदेहाची ओळख पटली आहे. उर्वरित सहा मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांची चिंता आणखी वाढली आहे.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील अनेक कुटुंबीय बारडोली येथे दाखल झाले आहेत. मात्र डीएनए अहवाल कधी येणार आणि मृतदेहांची ओळख कधी पटणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने संताप आणि असहायतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी
अपघातातील सहा मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने डीएनए चाचणीचा मार्ग स्वीकारला आहे. आतापर्यंत पाच प्रवाशांच्या नातेवाईकांनी बारडोली रुग्णालयात डीएनए नमुने दिले आहेत. या नमुन्यांच्या आधारे मृतांची ओळख निश्चित करण्यात येणार आहे. मात्र एका महिला प्रवाशाच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.
दोन एसटी बसची समोरासमोर धडक
सुरत-धुळे महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात झाला. धुळे आगाराची बस सुरतकडे जात असताना उवा गावाजवळ रस्त्यावर पलटी झालेला पाण्याचा टँकर दिसताच चालकाने बस वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण सुटल्याने बस महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या सुरत-जामनेर एसटी बसला धडकली.
धडकेनंतर सुरत-जामनेर बस रस्त्यालगतच्या पाटात जाऊन पडली आणि काही क्षणांतच तिला आग लागली. अपघात आणि त्यानंतर लागलेल्या आगीत बसमधील अनेक प्रवासी अडकले. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून 41 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
प्रशासनासमोर ओळख पटविण्याचे मोठे आव्हान
अपघात इतका भीषण होता की मृतांपैकी केवळ एका चालकाची ओळख पटविणे शक्य झाले आहे. उर्वरित मृतदेहांची ओळख डीएनए अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत मृतांच्या कुटुंबीयांना प्रतीक्षाच करावी लागणार असून बारडोली रुग्णालय आणि शवागार परिसरात हळहळ, अश्रू आणि आक्रोशाचे वातावरण कायम आहे.