Ashram school student food poisoning: जेवणात पाल पडलेली असतानाही तेच अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाढण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
नगराळा येथील प्रकाराने खळबळ; राजुरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
चंद्रपूर (Ashram school student food poisoning) : जिवती तालुक्यातील नगराळा येथील श्री. अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिलेल्या भोजनातून २९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी घडली. जेवणात पाल पडलेली असतानाही तेच अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाढण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुपारच्या भोजनानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी तसेच चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच शाळा प्रशासनाने तातडीने २९ विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मात्र, (Ashram school student food poisoning) आश्रमशाळेतील भोजनाच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेची माहिती पालक आणि ग्रामस्थांना मिळताच त्यांच्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित बाबतीत निष्काळजीपणा झाला असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेची संबंधित शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू असून, पोलिसांकडूनही घटनेची माहिती घेण्यात येत आहे. भोजनात पाल कशी पडली आणि विद्यार्थ्यांना तेच अन्न कशा प्रकारे देण्यात आले, याचा तपास झाल्यानंतर नेमकी जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे.