नांदेड परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी १ ते ३१ ऑगस्टदरम्यान अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, शस्त्र अधिनियमांतर्गत विशेष निर्मूलन मोहीम-२ उघडली आहे.
कारवाईमध्ये पोलीस ठाण्यांची व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची घोडदौड
हिंगोली : नांदेड परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी १ ते ३१ ऑगस्टदरम्यान अवैध दारू, गुटखा, मटका, जुगार, शस्त्र अधिनियमांतर्गत विशेष निर्मूलन मोहीम-२ उघडली आहे. या मोहिमेच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे १ ते २१ ऑगस्टदरम्यान संपूर्ण परिक्षेत्रात तब्बल १,२३३ गुन्हे दाखल झाले असून, १,९६२ इसमांविरुद्ध कारवाई करून ११ कोटी २४ लाख ८९ हजार ७२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होणे हेच स्पष्ट करते की जिल्ह्या-जिल्ह्यात अवैध धंदे आजही राजरोसपणे सुरू आहेत.
यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर चित्र अधिक गंभीर आहे. जिल्ह्यात या तीन आठवड्यांत एकूण २७९ गुन्हे दाखल झाले आहेत. यात गुटखा व्यावसायिकांविरुद्ध फक्त ४ गुन्हे दाखल करून ८ लाख ४ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ५ आरोपींवर कारवाई झाली, तर मटका-जुगाराचे ६० गुन्हे दाखल करून १३ लाख ९३ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल आणि १६५ आरोपींवर कारवाई करण्यात आली. अवैध दारूचे १६९ गुन्हे दाखल करून १० लाख ३३० रुपयांचा मुद्देमाल आणि १७० आरोपींवर कारवाई झाली. शस्त्र अधिनियमाचे ९ गुन्हे दाखल करून २८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आणि ९ आरोपींवर कारवाई करण्यात आली. तर इतर अधिनियमाखाली ३७ गुन्ह्यांमध्ये ७२ लाख १७ हजार ४८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४१ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व कारवाई जवळपास पोलीस ठाणे स्तरावर जोमाने करण्यात आली आहे. जिल्ह्याची मुख्य तपास शाखा समजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेकडून मात्र म्हणावी तशी ठोस आणि समाधानकारक कारवाई झालेली दिसून येत नाही. गुटखा तस्करी, मोठे मटका-जुगार अड्डे आणि अवैध शस्त्रसाठ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धाडसत्र राबवणे अपेक्षित असताना, किरकोळ कारवाई करून कागदोपत्री आकडे रंगवण्याचे काम सुरू असल्याची चर्चा पोलीस दलातच आहे.
हिंगोली जिल्ह्यात अवैध धंद्यांची मुळे खोलवर रुजलेली असताना एलसीबीची ही सुस्त भूमिका नेमकी कोणाला पाठीशी घालण्यासाठी आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दुसरीकडे नांदेड जिल्ह्यात ३५१, परभणीत २९९, तर लातूरमध्ये २९८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्या तुलनेत हिंगोलीत गुटखा आणि शस्त्र अधिनियमातील कारवाई अत्यंत कमी आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोहीम उघडल्यानंतर पोलीस ठाण्यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली; पण जिल्ह्याचे डोळे आणि कान असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेने मात्र अजूनही डोळेझाक केल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
अवैध धंद्याची माहिती द्यावी
दरम्यान, ही विशेष मोहीम पुढील आठवड्यात आणखी व्यापकपणे राबवण्यात येणार असून, नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती ९१ ५० १०० १०० या ‘खबर’ हेल्पलाईनवर फोन किंवा व्हॉट्सॲपद्वारे द्यावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे खबरे वळले
औंढा ना. पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वी देशी दारूच्या १० बॉक्ससह कार जप्त केली होती. हा छापा पोलीस अधीक्षकांच्या माहितीवरूनच मारण्यात आला होता. त्या पाठोपाठ आता आयजी शहाजी उमाप यांच्या पथकाने अनखळी येथे छापा मारून १ लाख ४२ हजार ७८० रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला होता.
विशेष म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांची माहिती मिळत असताना स्थानिक गुन्हे शाखेवरील खबऱ्यांचा विश्वास उडाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे ते वळल्याचे चित्र दिसून येत आहे.