Gram Panchayat Biometric: ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी) यांची हजेरी आता अनिवार्यपणे GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच नोंदवण्यात यावी, असे निर्देश
अंमलबजावणी न झाल्यास तक्रार करण्याचे शासनाचे आवाहन
चिखली (Gram Panchayat Biometric) : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) पुन्हा एकदा कडक सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी) यांची हजेरी आता अनिवार्यपणे GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच नोंदवण्यात यावी, असे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.
शासनाने यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये ही प्रणाली राबविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अनेक ग्रामपंचायतींमध्ये या नियमांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याच्या आणि अधिकारी वेळेवर उपलब्ध नसून नागरिकांची कामे रखडत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. याची गंभीर दखल घेत ग्राम विकास विभागाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी नवीन परिपत्रक काढून सर्व जिल्हा परिषद सीईओंना योग्य ती कार्यवाही करण्याचे पुनश्च आदेश दिले आहेत.
नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती व मार्गदर्शक सूचना:
आपल्या ग्रामपंचायतीत ही प्रणाली कार्यान्वित आहे की नाही, याकडे सर्व नागरिकांनी सतर्कतेने लक्ष देणे आवश्यक आहे.
तक्रार कशी करावी?
जर आपल्या गावात(Gram Panchayat Biometric) बायोमेट्रिक व GPS हजेरी सुरू नसेल किंवा अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसतील, तर नागरिक आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी (BDO) किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे लेखी अर्ज दाखल करू शकतात.
तक्रारीसोबत काय जोडावे?
१. अधिकारी अनुपस्थित असल्याचे छायाचित्र, व्हिडिओ किंवा इतर पुरावे.
२. ग्रामस्थांच्या सह्यांचे सामूहिक निवेदन/अर्ज.
३. यापूर्वी केलेल्या अर्जांची पोचपावती.
शासकीय कामाकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण व्हावे, यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी जागृत राहून नियमांची अंमलबजावणी न झाल्यास प्रशासनाकडे आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.