उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे हे परभणीत येऊन शेतकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, रखडलेल्या विकासकामांवरही ते भाष्य करणार आहेत.
खासदार संजय जाधव यांची माहिती; ३० ऑगस्टला इंदिरा गांधी स्टेडियमवर मेळावा
परभणी : उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे हे परभणीत येऊन शेतकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून, रखडलेल्या विकासकामांवरही ते भाष्य करणार आहेत. रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर हा संवाद मेळावा होणार असल्याची माहिती खासदार संजय जाधव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, या कार्यक्रमात राजकीय आखाडाही रंगणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार जाधव बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, माणिक पौंढे, पूर्णा तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे, जिल्हा परिषद सदस्य रितेश काळे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग खिल्लारे आणि बाळासाहेब पानपट्टे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार जाधव म्हणाले की, शहरातील क्रीडा संकुल मैदानावर होणाऱ्या संवाद मेळाव्याला हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती राहणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर, वकील व नागरिकांशीही संवाद साधण्यासाठी त्यांची वेळ घेतली जाईल.
जिल्ह्यातील अनेक प्रलंबित विकासकामांना गती देण्याबरोबरच नवीन विकासकामे मंजूर करून ती मार्गी लावण्यासाठी प्रयत्न या दौऱ्यादरम्यान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परभणी महानगरपालिकेच्या जीएसटी निधी संदर्भात मंगळवारी निर्णय होणार आहे. त्यामुळे मनपाचे आंदोलन लवकरच बंद होईल, असेही त्यांनी सांगितले. या मेळाव्याला २० ते २५ हजार शेतकरी येतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधकांना प्रत्युत्तर देणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेमधून उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत व आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिले जाणार आहे. त्यामुळे या सभेमध्ये कोण काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
दिग्गजांचा प्रवेश
खा. संजय जाधव यांनी उबाठाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरची पहिली सभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होत आहे. या सभेला ‘शेतकरी मेळावा’ असे नाव दिले असले तरी जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी व उबाठाचे अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. कोण-कोण प्रवेश करणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.