Bhim Shakti Organization: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारा २०० मिली टेट्रा पॅक दुधाचा निर्णय ताबडतोब रद्द करावा
हिंगोली (Bhim Shakti Organization) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारा २०० मिली टेट्रा पॅक दुधाचा निर्णय ताबडतोब रद्द करावा, या मागणीसाठी भीम शक्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाने ३१ ऑगस्ट रोजी घेतलेला दूध पुरवठ्याबाबतचा निर्णय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात नमूद आहे की, शासनाने पराग मिल्क फूड्स, पेनरगुडा (आंध्रप्रदेश) व श्रीचारना संघ लि. या दोन कंपन्यांना दूध पुरवठ्याचे कंत्राट दिले आहे. मात्र या कंपन्यांचे प्रत्येक जिल्ह्यात वितरक किंवा उत्पादक नाहीत. त्यामुळे प्रक्रिया केलेले दूध विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळ होत आहे.
यापूर्वी स्थानिक पातळीवर दूध पुरवठादार नेमून रोज ताजे व शुद्ध दूध गरम करून साखरयुक्त स्वरूपात दिले जात होते, जी पद्धत योग्य होती. ते पुरवठादार हे मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजातील असून या निर्णयामुळे ते बेरोजगार होणार आहेत, त्यांचाही विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हा निर्णय ताबडतोब रद्द करून पूर्वीप्रमाणे 'जैसे थे' आदेश द्यावेत, अन्यथा महाराष्ट्रभर विद्यार्थी व पुरवठादार रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर (Bhim Shakti Organization) भीम शक्ती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विशाल इंगोले, मिलिंद उबाळे, एकनाथ शिंदे, बंटी नागरे, बाजीराव इंगोले, अतुल नायक, चेतन उबाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.