Smart Meter Complaint: स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून स्थानिक वायरमनने जुन्या मीटरमध्ये छेडछाड केल्याचा, अवाजवी वीज बिल पाठवल्याचा तसेच महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप
१५ दिवसांत कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा
चिखली (Smart Meter Complaint) : तालुक्यातील शेलुद येथील एका महिला वीज ग्राहकाने घरात पुरुष सदस्य उपस्थित नसताना स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून स्थानिक वायरमनने जुन्या मीटरमध्ये छेडछाड केल्याचा, अवाजवी वीज बिल पाठवल्याचा तसेच महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेने महावितरणकडे लेखी तक्रार दाखल केली असून १५ दिवसांत कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
शेलुद येथील रहिवासी नंदा संतोष मोरे (ग्राहक क्रमांक ६१५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराचे (Smart Meter Complaint) वीज मीटर पूर्वी सुरळीत सुरू होते आणि त्यांना दरमहा साधारणपणे ५०० ते १००० रुपयांपर्यंत वीज बिल येत होते. १७ जून २०२६ रोजी वायरमन संदीप भुसारी व इतर दोन कर्मचारी त्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी आले होते. त्यावेळी घरात कोणताही पुरुष सदस्य उपस्थित नसल्याने नंदा मोरे यांनी मीटर बदलण्याचे काम घरातील सदस्य आल्यानंतर करण्याची विनंती केली. तक्रारीनुसार, या विनंतीवर वायरमन संदीप भुसारी यांनी उद्धट वर्तन करत जुन्या मीटरमध्ये छेडछाड केली आणि “आता नंतर तुम्ही माझ्या मागे फिराल,” अशी धमकी दिली. त्यानंतर अल्पावधीतच त्यांना तब्बल ६,७०० रुपयांचे वीज बिल प्राप्त झाल्याने त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
या (Smart Meter Complaint) प्रकरणी नंदा मोरे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता, उपविभाग चिखली यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे. मागील एक वर्षाच्या वीज बिलांची तपासणी करून नव्याने आलेले वाढीव बिल दुरुस्त करण्यात यावे तसेच महिला ग्राहकाशी कथित गैरवर्तन करणाऱ्या वायरमनवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तक्रार अर्जात त्यांनी नमूद केले आहे की, अर्ज दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित वायरमनवर कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. अशा परिस्थितीत कोणतीही जीवितहानी झाल्यास संबंधित वायरमन, कार्यकारी अभियंता आणि महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
या (Smart Meter Complaint) प्रकरणी न्याय मिळावा यासाठी चिखली येथील उपविभागीय कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. यावेळी युवासेना प्रमुख नंदूभाऊ कराडे, उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर, तालुका प्रमुख कीसनराव धोंडगे पाटील, गजानन पवार, सुनील रगडे, गजानन कुठे, पत्रकार संजय कदम व म्हस्के उपस्थित होते. दरम्यान, महिलेने केलेल्या आरोपांबाबत महावितरण प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.