Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मुंबई

जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी रंगवलेल्या पट्टीवरून वाद; प्रसाद वेदपाठक आक्रमक

मुंबईतील घाटकोपर परिसरातील ‘कैलास अवेन्यू’ सोसायटीमध्ये रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीच्या मुद्द्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे.


जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी रंगवलेल्या पट्टीवरून वाद प्रसाद वेदपाठक आक्रमक

White Strip Controversy |

मुंबई (White Strip Controversy) : मुंबईतील घाटकोपर परिसरातील ‘कैलास अवेन्यू’ सोसायटीमध्ये रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीच्या मुद्द्यावरून नवीन वाद निर्माण झाला आहे. युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी हा विषय सार्वजनिकपणे उपस्थित केल्यानंतर प्रकरण चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यामध्ये सोसायटी व्यवस्थापन आणि काही सदस्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

विद्याविहार येथील ज्या सोसायटीमध्ये प्रसाद वेदपाठक वास्तव्यास आहेत, त्या परिसरात काही सदस्यांनी इतर रहिवाशांची संमती न घेता पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वेदपाठक यांच्या म्हणण्यानुसार, जैन धर्मगुरूंच्या स्वागतासाठी ही पट्टी तयार करण्यात आली असून अशा प्रकारच्या कृतीबाबत कोणतीही पूर्वकल्पना किंवा परवानगी रहिवाशांकडून घेण्यात आलेली नव्हती.

या वादावर बोलताना प्रसाद वेदपाठक यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर काही घटकांकडून मास रिपोर्टिंग केल्याचा आरोप केला. केवळ या पट्टीमागील कारण विचारल्यामुळे त्यांच्या पेजेसना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. “माझा प्रश्न फक्त इतकाच होता की, ही पट्टी का रंगवली गेली? त्यावर स्पष्ट उत्तर मिळण्याऐवजी विरोध होत आहे,” असे ते म्हणाले.

सोसायटीतील संबंधित व्यक्तींशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करताना वेदपाठक म्हणाले की, सुरुवातीला पट्टी हटवण्याची तयारी दर्शवण्यात आली, मात्र नंतर धर्मगुरूंचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत ती कायम ठेवण्याची भूमिका मांडण्यात आली. त्यानंतर सोसायटी समिती अंतिम निर्णय घेईल, असेही त्यांना सांगण्यात आले. या परस्परविरोधी भूमिकेमुळे संभ्रम निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या कुटुंबाचा या परिसराशी दीर्घकाळ संबंध असल्याचा उल्लेख करताना वेदपाठक यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, त्यांच्या कुटुंबाच्या योगदानामुळेच ही इमारत उभी राहिल्याचा त्यांचा दावा असूनही आज त्यांनाच अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सोसायटीतील मंदिराच्या मालकीबाबतही त्यांनी भाष्य केले, मात्र तणाव वाढवणारी कोणतीही कृती करणे आपल्या संस्कारात नसल्याचे स्पष्ट केले.

वेदपाठक यांनी सांगितले की, त्यांच्या भूमिकेला केवळ मराठी समाजातूनच नव्हे तर जैन समाजातील अनेक व्यक्तींकडूनही पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या मते, धार्मिक श्रद्धा आणि त्यागाच्या मूल्यांशी विशेष सवलती किंवा व्हीआयपी वागणूक यांचा संबंध नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी रंगवण्यात येणाऱ्या अशा पट्ट्यांबाबतही त्यांनी आक्षेप नोंदवला. रस्त्यांवरील सुरक्षाविषयक चिन्हांकनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगताना त्यांनी नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख केला. स्पीड ब्रेकर न दिसल्याने अपघात टळल्याचे त्यांनी सांगितले आणि प्रशासनाने अशा महत्त्वाच्या ठिकाणी पांढऱ्या पट्ट्यांचा वापर करावा, अशी मागणी केली.

घाटकोपरमध्ये गेली 35 वर्षे वास्तव्य असून यापूर्वी अशा प्रकारच्या पट्ट्या परिसरात कधीही दिसल्या नसल्याचा दावा वेदपाठक यांनी केला. संबंधित व्यक्तींनी पट्टी काढून टाकण्याचे आश्वासन दिले असले तरी ती नेमकी कधी हटवली जाणार, हा मुख्य प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. आवश्यकता भासल्यास धरणे आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, प्रसाद वेदपाठक यांच्या माहितीनुसार, सोसायटीतील काही जैन समाजातील व्यक्तींनी ही पांढरी पट्टी रंगवली होती. सार्वजनिक जागांमध्ये धार्मिक परंपरांचे प्रदर्शन करण्याऐवजी त्या वैयक्तिक पातळीवर पाळाव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, अशा कृतींमुळे समाजात अनावश्यक धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांनी संबंधित पट्टी तातडीने हटवण्याची मागणी केली आहे.

Related to this topic: