शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील आदर्श महाविद्यालय येथील पाण्याच्या टाकीला मागील एक वर्षापासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
हिंगोली (Water Crisis) : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील आदर्श महाविद्यालय येथील पाण्याच्या टाकीला मागील एक वर्षापासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा काढावा यासाठी प्रभागातील सर्व नागरिकांनी नगराध्यक्षा, नगर परिषद हिंगोली यांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनासमोर सात प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. आपल्या टाकीला नियमित पाणीपुरवठा व्हावा, ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच टाकीवरून पाणीपुरवठ्याचा शिस्तबद्ध आराखडा तयार करावा, उपलब्ध पाणी आणि टाकी भरत असल्याचे दिसण्यासाठी इंडिकेटर बसवावेत, पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे यासाठी त्यांना ताकीद द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आदर्श कॉलनी, विवेकानंद नगर, हिलटॉप कॉलनी, भाग्य नगर आणि गोविंद नगर या भागांना वेगवेगळे डीपी द्यावेत, पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढवून द्यावा तसेच परिसरातील बंद पडलेले पथदिवे दुरुस्त करून द्यावेत, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
वर्षभरापासून सुरू असलेल्या या समस्येमुळे सर्व ऋतूंमध्ये नागरिकांचे हाल होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन स्वीकारताना हिंगोली नगर परिषद शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, मुख्याधिकारी अरविंद मुढे, नगरसेवक गणेश बांगर, खली बांगर, विशाल गोटरे तसेच पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी बाळू बांगर, पंडीत मस्के आणि चाटे उपस्थित होते. संबंधित निवेदन पाणीपुरवठा विभाग व विद्युत विभागाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आता प्रशासन या मागण्यांवर काय कार्यवाही करते, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. दिलेल्या निवेदनावर अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.