महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी बाभळगाव येथील वैशाली नगर परिसराला भेट देऊन तेथील स्थलांतरित कुटुंबांच्या अडचणींचा आढावा घेतला.
लातूर : महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी बाभळगाव येथील वैशाली नगर परिसराला भेट देऊन तेथील स्थलांतरित कुटुंबांच्या अडचणींचा आढावा घेतला. या कुटुंबांना शिधापत्रिका (रेशन कार्ड) उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वैशाली नगरात १९९५ पासून वास्तव्यास असलेल्या अनेक गौड आदिवासी कुटुंबांकडे स्वतःचे घर, नियमित रोजगार किंवा स्थिर उत्पन्नाचे साधन नाही. कागद गोळा करणे, कानातील मळ काढणे तसेच इतर छोटे-मोठे व्यवसाय करून ही कुटुंबे आपला उदरनिर्वाह करत आहेत.
महेश ढवळे यांच्या भेटीदरम्यान अनेक कुटुंबांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच इतर आवश्यक शासकीय कागदपत्रांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. यानंतर झिरो ते तीन वर्षे वयोगटातील बालके, तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती माता आणि स्तनदा माता यांची नोंद करून त्यांना तातडीने गरम, ताजा व पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याच्या तसेच मात्र वंदना योजनेचा आर्थिक लाभ देण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागातील संबंधित सीडीपीओ व सुपरवायझर यांना देण्यात आल्या.
तसेच, रेशन कार्ड नसलेल्या सर्व कुटुंबांची आवश्यक कागदपत्रे संकलित करून त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित तालुका पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
"कोणताही पात्र नागरिक शासनाच्या मूलभूत सेवा व योजनांपासून वंचित राहू नये. सर्व पात्र लाभार्थ्यांना तातडीने शासकीय सेवा व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात," असे निर्देश महेश ढवळे यांनी संबंधित विभागांना दिले.
यावेळी महिला व बालविकास विभाग तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या कांचन वाघमारे आणि जिल्हा प्रशासन संपर्कप्रमुख तुषार वासरकर उपस्थित होते.