पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
पुणे (Traffic Diversion) : पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी पावसाळा आणि संभाव्य दुर्घटनांचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने हवेली आणि राजगड तालुक्यातील दोन महत्त्वाचे पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या भागातील वाहतुकीच्या मार्गांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून नागरिकांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
हवेली तालुक्यातील कातवडी–कॉदूर–निळकंठेश्वर मार्गावरील मुठा नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरल्याने तो कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी याबाबत आदेश जारी केले असून पुलाच्या दोन्ही बाजूंना मजबूत अडथळे उभारण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
मुठा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली आहे. कातवडीकडून डावजे–कुरणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी कातवडी–बहुली–कोंढूर–डावजे–जांभळी–कुरण हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तर कुरण आणि डावजे परिसरातून कातवडीकडे येणाऱ्या वाहनांना कुरण–जांभळी–डावजे–कोंढूर–बहुली–कातवडी या मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राजगड तालुक्यातील खानापूर ते पानशेत मार्गावरील पानशेत वसाहतीजवळील मोठा पूलही सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल तब्बल ६८ वर्षांहून अधिक जुना असून तांत्रिक तपासणीत त्याची रचना अत्यंत कमकुवत झाल्याचे आढळून आले आहे. प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गजानन पाटील यांनी जारी केलेल्या आदेशानुसार या पुलावरून जड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लवासा, वरसगाव, पानशेत आणि आसपासच्या पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
लवासा आणि वरसगाव परिसरातून पानशेतकडे जाणारी वाहतूक निळकंठेश्वर–डवजे–कोंढूर–बहुली–कातवडी–मांडवी–कुडजे–खडकवासला धरणमार्ग–गोऱ्हे–खानापूर या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच पानशेत आणि वरसगाव धरण परिसरातून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी कुरण खुर्द–राणवडी–सोनपूर–ओसाडे–खानापूर–गोऱ्हे–खडकवासला धरणमार्ग–कुडजे–मांडवी–कातवडी–बहुली–कोंढूर–डवजे–निळकंठेश्वर असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना वाहतुकीच्या नव्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच बंद करण्यात आलेल्या पुलांवरून कोणत्याही परिस्थितीत वाहने नेऊ नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.