पुण्यातील उच्चभ्रू परिसरात मसाज सेंटरच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पुणे (Spa Racket Busted) : पुण्यातील उच्चभ्रू परिसरात मसाज सेंटरच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. कल्याणीनगर-येरवडा परिसरातील एका स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली, तर या प्रकरणात २१ वर्षीय व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.
बनावट ग्राहकाद्वारे उघड झाला प्रकार
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जॉगर्स पार्कजवळील ईश्वरधाम अपार्टमेंटमध्ये ‘निरा स्पा’ नावाने सुरू असलेल्या सेंटरमध्ये संशयास्पद हालचाली सुरू होत्या. बाहेरून साधारण स्पा सेंटरसारखे दिसणाऱ्या या ठिकाणी मसाजच्या नावाखाली ग्राहकांना देहव्यापाराची ऑफर दिली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला.
एक बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री करण्यात आली. आत सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकाराची पुष्टी होताच पोलिसांनी रात्री सुमारे साडेआठ वाजता छापा टाकला.

२१ वर्षीय व्यवस्थापक अटकेत
या कारवाईदरम्यान अरमान रहिमउद्दीन हुसेन (वय २१) याला ताब्यात घेण्यात आले. एवढ्या कमी वयात तो संपूर्ण रॅकेट चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच, या ठिकाणाहून दोन तरुणींची सुटका करण्यात आली असून त्यांना पैशाचे आमिष दाखवून या व्यवसायात ओढल्याचे निष्पन्न झाले आहे.
आणखी आरोपींचा शोध सुरू
या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून ‘राज’ नावाच्या संशयिताचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमूला आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान आणि निरीक्षक विजय ठाकर यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.
नागरिकांमध्ये संताप
पुण्यासारख्या शहरातील पॉश भागात अशा प्रकारचे रॅकेट सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्पा आणि वेलनेस सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.