Electricity Smart Meter: स्मार्ट मीटर बसवल्यापासून सर्वसामान्य ग्राहकांना पूर्वीपेक्षा चौपट, पाचपट अव्वाच्या सव्वा बिले येत आहेत. सर्वसामान्य वीज ग्राहकांवर हा डिजिटल दरोडा आहे, असा आरोप
सर्वसामान्य वीज ग्राहकांवर डिजिटल दरोडा टाकल्याचा आरोप
औसा (Electricity Smart Meter) : कुठल्याही ग्राहकाची मागणी नसताना महावितरणने ग्राहकाच्या पूर्व परवानगीशिवाय लातूर जिल्हाभरात स्मार्ट मीटर बसवून सरकारने महावितरणचे अदानीकरण केले आहे. हे स्मार्ट मीटर बसवल्यापासून सर्वसामान्य ग्राहकांना पूर्वीपेक्षा चौपट, पाचपट अव्वाच्या सव्वा बिले येत आहेत. सर्वसामान्य वीज ग्राहकांवर हा डिजिटल दरोडा आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी (दि.३) औसा तालुक्यातील किल्लारी येथे स्मार्ट मीटरची होळी करण्यात आली.
तात्काळ काढून घ्यावेत आणि (Electricity Smart Meter) पूर्वीचे मीटर तात्काळ बसवावेत अन्यथा जिल्हाभरात आंदोलने करण्यात येतील, असा इशारा यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी दिला. महावितरण आणि सरकारच्या या स्मार्ट मीटर योजनेच्या संदर्भात ग्राहकाच्या मनामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. जे की पिठाची गिरणी, तेलाचा घना, मिरची कांडप, इस्त्री दुकान यांना ज्या प्रकारे बिले येतात, तशी बिले सामान्य घरगुती ग्राहकांना येत आहेत. इकडे लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे आणि भाऊजींच्या खिशातून महिन्याला तीन हजार रुपयांच्यावर पैसे काढून घ्यायचे. म्हणजेच सुई द्यायची आणि तलवार घेऊन जायची, असा हा सरकारचा कार्यक्रम चालू आहे, असा आरोप यावेळी नागराळे यांनी केला.

या (Electricity Smart Meter) आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे, तालुकाध्यक्ष धनराज गिरी, विधानसभा संघटक महेश बनसोडे, माजी तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने, प्रवीण कठारे, विकास लांडगे, अमोल थोरात, अमोल परिहार, कृषीचे तालुका अध्यक्ष गोविंद चव्हाण, महादेव गायकवाड, विकास पल्ले, मच्छिंद्र मेंढे, विनोद जाधव, नामदेव जाधव, संदीप खराते, प्रवीण पोतदार, प्रवीण जाधव, बालाजी जाधव, करण खराते, सागर गायकवाड, राहुल जाधव, अमर जाधव, महेश हंगरगे, शत्रुघ्न गायकवाड इत्यादी पदाधिकारी,तक्रारदार ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.