Srimad Bhagwat katha: संसारात सर्वत्र दुःख असताना आपण त्यालाच सुख समजतो, हीच माणसाची मोठी चूक आहे, असे परखड विचार मांडत प.पू. भाईश्री रमेशभाई ओझा यांनी श्रीमद भागवत कथेतून जीवनाचे गूढ उलगडले.
श्रीमद भागवत कथेचा चौथा दिवस
हिंगोली (Srimad Bhagwat katha) : संसारात सर्वत्र दुःख असताना आपण त्यालाच सुख समजतो, हीच माणसाची मोठी चूक आहे, असे परखड विचार मांडत प.पू. भाईश्री रमेशभाई ओझा यांनी श्रीमद भागवत कथेतून जीवनाचे गूढ उलगडले.
येथील रामलीला मैदानावर रविवारी चौथ्या दिवशी कथेला (Srimad Bhagwat katha) सुरुवात होण्यापूर्वी मुख यजमान श्री नंदकिशोर शर्मा तर दैनिक यजमान म्हणून रमेश चंद्र सावरमल बगडिया, पदमाबाई शिंदे, नवनीत राठोर यांच्या वतीने ग्रंथाची पूजा अर्चना करण्यात आली. त्यानंतर भजन गात कथेला सुरुवात झाली.

भाईश्री पुढे म्हणाले की, संसारात दिसणारे सुख हे अनित्य आहे. परिवारात अशांतता, कलह आणि तणाव निर्माण होणे हीच संसाराची खरी ओळख आहे. तरीही माणूस या दुःखमय अवस्थेलाच सुख समजून त्यात अडकून राहतो. त्यानंतर भाईश्री यांनी दोह्याच्या माध्यमातून ‘नित्यानंद’ या शाश्वत आनंदाचा अनुभव स्पष्ट केला. “जो आनंद सिंधू सुखराशी” या ओवीतून त्यांनी सांगितले की, खरा आनंद हा बाह्य वस्तूंमध्ये नसून अंतर्मनात आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनात आहे. सद्गुरूच माणसाला योग्य दिशा दाखवतात, असे त्यांनी अधोरेखित केले.
कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग यातील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, कर्ममार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला सुख हवे असते, तर भक्तीमार्गातील व्यक्तीला ‘आनंद’ हवा असतो. स्वर्गातील सुख उच्च असले तरी तेही अनित्यच आहे, मात्र भक्तीतून मिळणारा आनंद नित्य आणि शाश्वत असतो. जीवनातील विषमता मांडताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “एखादा माणूस झोपडीत जन्म घेतो तर दुसरा श्रीमंत घराण्यात का?” याचे उत्तर देताना त्यांनी कर्मसिद्धांत स्पष्ट करत प्रत्येकाच्या जीवनातील परिस्थिती ही त्याच्या कर्मांवर आधारित असल्याचे सांगितले. भागवत कथा हीच माणसाला योग्य मार्ग दाखवणारी आहे, असे सांगत त्यांनी प्रथम स्कंधातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे सविस्तर विवेचन केले.
यावेळी मौनी बाबांच्या कथेद्वारे (Srimad Bhagwat katha) खोट्या साधूंचा पर्दाफाश करत त्यांनी सांगितले की, काही लोक केवळ वेशभूषा आणि दिखावा करून लोकांना फसवतात व पैशावर डल्ला मारतात. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या साधूंमध्ये फरक ओळखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भागवत कथेतून दिलेल्या या जीवनमूल्यांनी उपस्थित भाविकांना आत्मचिंतनाचा नवा दृष्टिकोन दिला. यावेळी हजारो भविकांनी कथेचा लाभ घेतला. रात्री कृष्ण जन्म सोहळा पार पडला.