बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील सरपंच शकुंतलाबाई महाले यांना पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय 'सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६' मध्ये 'सह्याद्रीरत्न गुणगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
बुलढाणा : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील सरपंच शकुंतलाबाई महाले यांना पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय 'सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६' मध्ये 'सह्याद्रीरत्न गुणगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
समाजात क्रांतिकारी बदल घडवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत गावाच्या विकासासाठी विविध कामे राबवल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. गावातील स्वच्छता व्यवस्थेसाठी घनकचरा वाहून नेण्यासाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून देणे, सिमेंट रस्ते व नाली बांधकाम, चक्रधर स्वामी कमान, चक्रधर स्वामी मंदिरासाठी सभागृह, ग्रामपंचायत भवन, पाधन रस्ता, अल्हाटवाडी डांबरी रस्ता, शनिश्वर वाडी सिमेंट रस्ता, गावातील बारी, समाजासाठी मोठे मंगल कार्यालय, माळी समाजासाठी सभागृह, जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी व नळ योजना तसेच वसुंधरा योजनेसारखे विविध विकासकामे गावात राबविण्यात आली. या कार्याचा विचार करून त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय 'सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६' पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला ARJ एशिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन मा. जितेंद्र तुळशीराम दाते तसेच 'देऊळ बंद' चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आर्या घारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
या सोहळ्यात सामाजिक, राजकीय, सेवा, आरोग्य, कला, शिक्षण, उद्योग तसेच विविध संस्थांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
पुरस्काराचे स्वरूप भव्य असून प्रत्येक गुणवंताला सन्मानचिन्ह, मानपत्र आणि मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच पुरस्कार विजेत्यांच्या कार्याची ओळख समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे मा. जितेंद्र तुळशीराम दाते यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "उद्योग आणि समाजसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना जेव्हा असा सन्मान मिळतो, तेव्हा त्यांच्यावर जबाबदारी वाढते. समाजातील गुणीजनांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे."
तर अभिनेत्री आर्या घारे यांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करताना, "कला आणि समाजकार्यासाठी दिलेले हे योगदान पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल," असे मत व्यक्त केले.
हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा महाउत्सव ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सन्मानित व्यक्तींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमाला माजी सरपंच शेषराव सावळे, दिलीप शिनकर, मधुकर महाले, नंदकिशोर देशमुख, कृष्णा सिनकर आणि बाळू सपकाळ यांची उपस्थिती होती.