परांजपे यांच्या या निर्णयामुळे अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसल्याचे मानले जात आहे.
ठाणे (Resignation) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची सूत्रे हाती घेतली असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे. मात्र, पक्षात अंतर्गत घडामोडी वेग घेत असल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे समन्वयक आनंद परांजपे यांनी पक्षातील सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवत आपला निर्णय कळवला.
“मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस तथा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश, ठाणे-पालघर समन्वयक आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. माझा राजीनामा स्वीकारावा,” असा आशय त्यांच्या पत्रात नमूद आहे.
आनंद परांजपे यांची X पोस्ट
परांजपे यांच्या या निर्णयामुळे अजित पवार गटाला आणखी एक धक्का बसल्याचे मानले जात आहे. अलीकडेच विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. झिशान सिद्दीकी यांना संधी मिळाल्यानंतर त्यांच्या नाराजीला अधिकच खतपाणी मिळाल्याचे बोलले जात आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांमध्येही त्यांना डावलण्यात आल्याची भावना होती.
शिवसेनेकडे वाटचाल?
राजीनाम्यानंतर आनंद परांजपे यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी अलीकडच्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात शिवसेना एकसंघ असताना त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता ते पुन्हा ‘घरवापसी’ करणार का, याची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, परांजपे यांनी अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नसला तरी त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे-पालघरमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.