Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > अमरावती

Rescue Team

काळरात्र, नदीचे रौद्र रूप अन् 'देवदूतांचे' आगमन!; अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकाने १६ जणांना दिले जीवदान

३० जुलै २०२६ च्या भयाण रात्री जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या कोपाने १६ निष्पाप जिवांचा श्वास रोखून धरला होता.


काळरात्र नदीचे रौद्र रूप अन् देवदूतांचे आगमन अमरावती जिल्हा शोध व बचाव पथकाने १६ जणांना दिले जीवदान

Rescue Team |

एकाच रात्री संग्रामपूर आणि राजुरा येथे दोन धाडसी बचाव मोहिमा यशस्वी; पुराच्या तावडीतून १६ नागरिकांची सुखरूप सुटका

अमरावती : ज्यावेळी चारी बाजूंनी मृत्यूचे थैमान सुरू असते, नद्यांचे रौद्ररूप मानवी वस्त्या कवेत घेण्यासाठी घोंगावत असते आणि काळोख्या रात्रीत आशेचा शेवटचा किरणही मावळत आलेला असतो; नेमक्या त्याच क्षणी स्वतःचा जीव मुठीत धरून मदतीला धावून येतात ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे शोध व बचाव पथक.

३० जुलै २०२६ च्या भयाण रात्री जिल्ह्यातील संग्रामपूर आणि राजुरा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी निसर्गाच्या कोपाने १६ निष्पाप जिवांचा श्वास रोखून धरला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे आणि रेस्क्यू टीमच्या शौर्यामुळे या १६ जणांना मृत्यूच्या दाढेतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

संग्रामपूरमध्ये छतावर अडकलेल्या ९ जणांची सुटका

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर येथे गावालगत वाहणाऱ्या बेंबळा नदीने ३० जुलै रोजी रात्री रौद्ररूप धारण केले. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी काही क्षणांत गावात शिरले. रात्री सुमारे ११ वाजता पूर अचानक वाढल्याने नागरिक घरात अडकले आणि प्राण वाचवण्यासाठी छतावर आश्रय घ्यावा लागला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या तात्काळ आदेशानुसार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक रात्री १२.१० वाजता सर्व आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

रात्रीचा अंधार, वेगवान पुराचा प्रवाह आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पथकाने धैर्याने बचावकार्य सुरू ठेवले. वयोवृद्ध आणि लहान मुलांना प्राधान्य देत हनुमंत उके (३४), रवी मेश्राम (३८), सुभाष भोईर (४०), सतीश मारभते (२८), आशिष उके (१८), गौरव मारबले (२२), ओम गिरी (१८), अमोल भोयर (२९) आणि अनिकेत केवट (२५) यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

या मोहिमेत विशाल निमकर, कौस्तुभ वैद्य, पी. एस. गायकवाड, गणेश कायदेकर, सुरज ठाकूर, दीपक भोईटे, मनीष उताणे आणि गोकुळ मुंडे यांनी सहभाग घेतला.

राजुरात सापांचा सामना करत ७ जणांची सुखरूप सुटका

याच रात्री राजुरा येथील मोखड नदीत पुराच्या पाण्यात ७ जण अडकल्याची माहिती रात्री ८.३५ वाजता नियंत्रण कक्षाला मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुसरे आपत्ती व्यवस्थापन पथक रात्री ९.२० वाजता घटनास्थळी दाखल झाले.

मोखड नदीतील पुराच्या पाण्यात मोठे लाकडी ओंडके, झाडेझुडपे तसेच विषारी साप वाहत येत असतानाही पथकाने कोणतीही भीती न बाळगता रबर बोटीद्वारे बचावकार्य सुरू केले. या सात जणांमध्ये ४ महिला, २ पुरुष आणि अवघ्या २ वर्षांची अनन्या जाधव यांचा समावेश होता.

अवघ्या ३० मिनिटांत पथकाने साहेबराव जाधव, सावित्री जाधव, पूनम जाधव, जेतालाल जाधव, अनन्या जाधव (वय २ वर्षे), सोनम जाधव आणि रीना जाधव यांना सुखरूप बाहेर काढले.

या मोहिमेत सचिन धरमकर, आकाश निमकर, मुकेश सदाशिव, सचिन पवार, चैतन्य पोहाणे, प्रफुल भुसारी, अजय आसोले, आपदा मित्र तुळशीराम गोडाणे आणि भूषण काळे यांनी सहभाग घेतला.

दोन्ही बचाव मोहिमांदरम्यान महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले. रात्रीच्या वेळी पार पडलेल्या या धाडसी बचावकार्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुराच्या तावडीत अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शोध व बचाव पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related to this topic: