औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी ते फुलदाभा या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा दोन दिवसांपूर्वी मोठ्या थाटात वृक्ष लागवड करण्यात आली होती.
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी ते फुलदाभा या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा दोन दिवसांपूर्वी मोठ्या थाटात वृक्ष लागवड करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धन आणि रस्त्याचे सौंदर्य वाढावे या उद्देशाने शासनाच्या निधीतून ही लागवड करण्यात आली होती. प्रत्येक झाडाला संरक्षणासाठी जाळी आणि लोखंडी पाईपही बसवण्यात आले होते. या कामावर लाखो रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या कामाचा दर्जा किती निकृष्ट होता, हे दुसऱ्याच दिवशी उघड झाले.
लागवडीनंतर अवघ्या २४ तासांतच बहुतांश झाडे उन्मळून पडली असून काही झाडे मोडून रस्त्याच्या कडेला पडलेली आहेत. अनेक ठिकाणी जाळ्या आणि लोखंडी पाईपही जागेवरून निखळल्याचे दिसून आले. पाऊस किंवा वाऱ्यामुळे नव्हे, तर कामातील हलगर्जीपणा आणि निकृष्ट साहित्य वापरामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या प्रकारामुळे केवळ शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला नसून पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशालाही तडा गेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेली वृक्ष लागवड दुसऱ्याच दिवशी नष्ट होणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, वाया गेलेल्या झाडांच्या जागी दर्जेदार पद्धतीने पुन्हा वृक्ष लागवड करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर स्थानिक नागरिकांनीही या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांची अशी अवस्था होत असल्यास पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा केवळ कागदावरच राहतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.