Parbhani power supply: परभणी शहरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक व व्यापारी वर्ग त्रस्त झाले आहेत. महावितरणाच्या दुरुस्तीच्या नावाखाली
परभणीत दुरुस्तीच्या नावाखाली चार चार तास विजपुरवठा गुल महावितरणचा गलथान कारभार
परभणी (Parbhani power supply) : शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरु असताना मागील काही दिवसांपासून भर उन्हाळ्यात सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. उकाड्याने त्रस्त नागरीक आणि व्यापारीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. बिल नियमित भरूनही वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महावितरणकडून दुरुस्ती व मेंटेनन्सच्या कारणाखाली दिवसा तसेच रात्री चार-चार तास वीज बंद ठेवली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे व्यापारी, लहान उद्योग करणारे व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये (Parbhani power supply) वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. विशेषतः उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क साधल्यास प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. डीपी मेंटेनन्स, तसेच वीज तारा व झाडांच्या फांद्यांचा अडथळा दूर करण्याची कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात समस्या कायम असल्याने नाराजी वाढत आहे. दर्गा रोड, जिंतूर रोड, भीमनगर, जुना पेडगाव रोड, शिवाजी चौक, विद्यानगर, अपना कॉर्नर, धार रोड, गव्हाणे चौक, शंकर नगर, दत्तधाम आदी भागांमध्ये ही समस्या अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. झोपडपट्टी भागातील नागरिकांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. दरम्यान, उर्वरित दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करावा, तसेच वारंवार होणार्या वीज खंडितीपासून नागरिकांची मुक्तता करावी, अशी मागणी नागरीकांच्या वतीने होत आहे.
फ्युज कॉल नावालच; तक्रारीचा नंबर मात्र बंद
शहरातील खंडोबा बाजार परिसात असलेल्या फ्युज कॉल येथे (Parbhani power supply) विज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती देण्यासाठी महावितरणच्या वतीने दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला असता तो सतत बंद येत असून त्यामुळे तक्रारीसाठी दिलेला नंबर केवळ नावालाच का असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहेत.