देशातील लाखो तरुणांचे भवितव्य ठरवणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG 2026) परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
रिसोड (NEET UG 2026) : देशातील लाखो तरुणांचे भवितव्य ठरवणाऱ्या ‘नीट-यूजी २०२६’ (NEET-UG 2026) परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे परीक्षा प्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे रिसोड विधानसभा प्रमुख तथा माजी सभापती विश्वनाथ सानप यांनी केली आहे.
परीक्षा प्रणालीवर मोठा आघात
यावेळी बोलताना विश्वनाथ सानप म्हणाले की, “प्रवेश परीक्षांच्या सचोटी आणि पारदर्शकतेशी कोणतीही तडजोड होता कामा नये. जर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका काही ठराविक लोकांपर्यंत पोहोचत असतील, तर हा केवळ तांत्रिक बिघाड नसून संपूर्ण परीक्षा प्रणालीवर झालेला गंभीर आघात आहे. वर्षभर दिवस-रात्र मेहनत करून तयारी करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्यावर हा मोठा अन्याय आहे.”
पेपरफुटीच्या या प्रकरणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करून पात्र विद्यार्थ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले जात असल्याचे सानप यांनी नमूद केले.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मागणी केली की,
• संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि वेळेत चौकशी करण्यात यावी.
• संसदीय समिती (Parliamentary Committee) स्थापन करून चौकशीची व्याप्ती वाढवावी.
• दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
“लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टाची थट्टा करणाऱ्यांना पाठीशी घालू नका. त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे,” असा इशाराही विश्वनाथ सानप यांनी दिला आहे.