मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील ही विद्यार्थिनी नागपुरात आपल्या कुटुंबासह राहत होती.
नागपूर (NEET Aspirant Suicide) : वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या २० वर्षीय NEET परीक्षार्थी विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली असून, परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि पुनर्परीक्षेच्या शक्यतेमुळे ती मानसिक तणावाखाली गेल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे NEET परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वादावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील ही विद्यार्थिनी नागपुरात आपल्या कुटुंबासह राहत होती. तिचे वडील नागपुरात स्वयंपाकी म्हणून काम करतात. मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेअंतर्गत सुमारे ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच नातेवाईकांकडूनही आर्थिक मदत घेतली होती. विद्यार्थिनीने सुमारे १४ दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीय मूळ गावी परतल्यानंतर तिच्या पुस्तकात एक कथित सुसाईड नोट सापडली. त्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थिनीने NEET परीक्षेसाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम घेतले होते. परीक्षा दिल्यानंतर ती खूप आनंदी होती आणि चांगले गुण मिळतील तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी निवड होईल, असा तिला विश्वास होता. मात्र, परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि परीक्षा रद्द होण्याच्या बातम्या समोर आल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या खचली.
कथित सुसाईड नोटमध्ये विद्यार्थिनीने लिहिले आहे, *"NEET परीक्षेत चांगले गुण मिळतील, अशी मला खूप आशा होती. पण आता पुन्हा परीक्षा द्यावी लागली तर मी तितकीच चांगली कामगिरी करू शकेन याची कोणतीही खात्री नाही. आई-बाबा, मला माफ करा. मी सर्व काही बिघडवून टाकले."*
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, परीक्षेनंतर ती आत्मविश्वासाने भरलेली होती. मात्र, परीक्षेसंदर्भातील वाद आणि अनिश्चिततेमुळे ती नैराश्यात गेली. सुरुवातीला तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण कुटुंबीयांच्या लक्षात आले नव्हते. मात्र, सुसाईड नोट सापडल्यानंतर परिस्थिती स्पष्ट झाल्याचा त्यांचा दावा आहे.
विद्यार्थिनीच्या वडिलांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले की, "माझी मुलगी अभ्यासात अत्यंत हुशार होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. तिच्या शिक्षणासाठी आम्ही लाखो रुपयांचे कर्ज घेतले. परीक्षा झाल्यानंतर ती खूप आनंदात होती. पण पेपरफुटी आणि परीक्षा रद्द झाल्याच्या बातम्यांनंतर ती पूर्णपणे खचून गेली. व्यवस्थेतील त्रुटींमुळे माझ्या २० वर्षांच्या कष्टांवर पाणी फिरले."
ते पुढे म्हणाले, "माझा धाकटा मुलगा नववीत शिकत आहे. आता त्यालाही शिक्षणापासून दूर करून शेतीकडे वळवावे का, असा विचार मनात येतो. कारण मुलांना शिक्षणासाठी झटायला लावायचे आणि शेवटी व्यवस्थेच्या अपयशाचा फटका त्यांनाच बसायचा, हे दुर्दैवी आहे."
दरम्यान, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यश घंघोरिया यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले असून विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या प्रश्नातही सहकार्य करण्याचे सांगितले आहे. NSUI ने कुटुंबाला तातडीची २.५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून किसान क्रेडिट कार्डवरील ३ लाख रुपयांचे कर्ज फेडण्यासाठीही मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
या घटनेमुळे स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक परिणाम, परीक्षाव्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची अधिकृत चौकशी आणि सुसाईड नोटची सत्यता तपासल्यानंतरच आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.