Nanded Firefighters: नांदेडमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी महापौर कविता मुळे यांनी जवानांच्या कार्याचे कौतुक करत, त्यांना अधिक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.
अत्याधुनिक सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध' - महापौर कविता मुळे
अग्निशमन सेवा सप्ताहाचा प्रारंभ: हुतात्मा जवानांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन
नांदेड (Nanded Firefighters) : १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीतील भीषण अग्निकांडात वीरमरण आलेल्या ६६ जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि जनतेत जनजागृती करण्यासाठी देशभरात दरवर्षी १४ ते २० एप्रिल दरम्यान 'अग्निशमन सेवा सप्ताह' पाळला जातो. याच निमित्ताने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या वतीने शहरातील मुख्य अग्निशमन कार्यालयात १४ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० वाजता आयोजित या (Nanded Firefighters) कार्यक्रमात अग्निशमन दलात सेवा देताना प्राणांची आहुती दिलेल्या शहीद जवानांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर कविता मुळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. मंचावर उपमहापौर दिपकसिंग रावत, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, गट नेते सय्यद मुजीब सय्यद मुख्तार, गट नेते साबेर चाऊस नासेर चाऊस, उपायुक्त अजितपालसिंग संधू,उपआयुक्त अभिजित वायकोस, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे यांनी विभागाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मागील वर्षभरात विभागाने सुमारे २०० आगीच्या घटनांवर यशस्वीरीत्या नियंत्रण मिळवले आहे. तसेच त्यांनी विभागाकडील अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येसह कामात येणाऱ्या अडचणींचाही माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमास अग्निशमन विभागाचे सर्व जवान व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौरांकडून जवानांचे कौतुक व आश्वासने
अध्यक्षीय भाषणात महापौर कविता मुळे यांनी जवानांच्या साहसाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, "आग लागल्यावर सर्वजण दूर पळतात, पण अग्निशमन जवान आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आगीत शिरतात. त्यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाला अत्याधुनिक साहित्य आणि उच्च दर्जाचे प्रॉक्झिमिटी सूट लवकरच उपलब्ध करून दिले जातील. तुम्ही नागरिकांची काळजी घ्या, आम्ही तुमची काळजी घेऊ."असे म्हणत त्यांनी सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छाही दिल्या.
कंत्राटी जवानांना विमा कवच देणार : आयुक्त डाॅ. डोईफोडे
मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनीही जवानांच्या कामगिरीचा गौरव केला. विशेष म्हणजे, (Nanded Firefighters) कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या जवानांना कामादरम्यान अपघात झाल्यास शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच १ कोटी रुपयांचे विमा कवच मिळावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून त्यांना हा लाभ मिळवून दिला जाईल, असे महत्त्वाचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.