वादातून टॉवेलने हात बांधून गळ्यातील गमछ्याने गळा आवळून सहकाऱ्याचा खून केल्याप्रकरणी फरार आरोपीला पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून जेरबंद केले.
कामाच्या कारणावरून लांजी शिवारात झाला होता वाद; अहमदपूर पोलिसांची कारवाई
लातूर (Murder Case) : अहमदपूर येथे दिवसभर मिस्त्रीचे काम करून संध्याकाळी मजुरीचे पैसे घेतल्यानंतर दारू पिऊन लांजी गावाजवळील गायरान परिसरात जेवणासाठी थांबलेल्या दोन सहकाऱ्यांमध्ये कामाच्या कारणावरून वाद झाला. या वादातून टॉवेलने हात बांधून गळ्यातील गमछ्याने गळा आवळून सहकाऱ्याचा खून केल्याप्रकरणी फरार आरोपीला पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातून जेरबंद केले.
सुमारे २० दिवसांपूर्वी गोविंद फटाटे (रा. नावंदी, ता. उदगीर, जि. लातूर) यांचा लांजी शिवारातील गायरान परिसरात खून झाला होता. याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपी बालाजी बाबू जाधव (वय ३९, रा. मुगाव तांडा, ता. नायगाव, जि. नांदेड) हा गुन्ह्यानंतर फरार होता. दरम्यान, तो नांदेड जिल्ह्यातील मुखेडजवळील सलगरा फाटा परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला.
आरोपी तेथे येताच त्याला पोलिसांची चाहूल लागल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला अहमदपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहेत.
ही कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे तसेच पोलीस अमलदार तुराबखान पठाण, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, रामलिंग शिंदे, राजेश कंचे, गणेश साठे, श्रीनिवास जांभळे, शैलेष सुडे, अंजली गायकवाड आणि रामदास बाचीफळे यांनी पार पाडली.