महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात आणि थकित बिलांच्या प्रश्नावरून हिंगोली जिल्हा इलेक्ट्रिकल कंत्राटदार असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
हिंगोली (MSEDCL Issue): महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात आणि थकित बिलांच्या प्रश्नावरून हिंगोली जिल्हा इलेक्ट्रिकल कंत्राटदार असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 1 मे पासून जिल्ह्यातील वीज देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे बंद करण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला असून प्रत्यक्षात कामबंद आंदोलन सुरू झाले आहे.
असोसिएशनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार महावितरणकडून कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले दीर्घ काळापासून थकवण्यात आली आहेत. वारंवार मागणी करूनही बिले मिळत नसल्याने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शिवाय अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बिले तात्काळ द्या आणि अन्यायकारक कारभार थांबवा अशी मागणी कंत्राटदारांनी केली आहे.
या आंदोलनामुळे 1 मे पासून उच्चदाब वाहिनी, लघुदाब वाहिनी तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक व ब्रेकडाऊन कामे पूर्णपणे बंद राहणार आहेत. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात वाढलेला वीज वापर आणि वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर देखभाल कामे बंद राहिल्यास नागरिकांना वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.
हा लढा जनतेच्या सुरक्षेसाठीच असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे. थकित बिले न मिळाल्याने दुरुस्ती साहित्य खरेदी करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले आहे. त्यामुळे दर्जेदार काम करणे शक्य होत नाही. वीज व्यवस्था सुरळीत हवी असेल तर महावितरणने तातडीने थकित बिले अदा करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.
कंत्राटदारांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले असून हक्कासाठी लढा हीच बांधिलकी असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान महावितरणने यावर तातडीने तोडगा काढावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अन्यथा जिल्ह्यात वीज संकट गडद होण्याची भीती आहे.