शहरातील नारायण नगर परिसरात दहशत माजवून दोन महिलांवर हल्ला करणाऱ्या दोन माकडांना वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अखेर पिंजरा लावून पकडले आहे.
हिंगोली (Monkey Attack) : शहरातील नारायण नगर परिसरात दहशत माजवून दोन महिलांवर हल्ला करणाऱ्या दोन माकडांना वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने अखेर पिंजरा लावून पकडले आहे. मंगळवारी (३० जून) सकाळी ही दोन्ही माकडे पिंजऱ्यात अडकली असून त्यांना लवकरच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.
हिंगोली शहरातील नारायण नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन माकडांचा धुडगूस सुरू होता. या माकडांनी दोन महिलांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, सहायक वनसंरक्षक सचिन माने आणि वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी तातडीने रेस्क्यू पथकाला घटनास्थळी रवाना केले. माकडांना पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार वनविभागाच्या रेस्क्यू पथकातील कर्मचारी संग्राम भालेराव, विनायक राऊत आणि उमेश मोहरील यांनी सोमवारपासून नारायण नगर परिसरात पिंजरा लावून माकडांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले होते. अखेर ३० जून रोजी सकाळी दोन्ही माकडे पिंजऱ्यात अडकली.
वन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून या दोन्ही माकडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
या कारवाईमुळे नारायण नगर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.