कडक उन्हाने होरपळणाऱ्या विदर्भात आता रेल्वे प्रवाशांनादिलासा देणारी गार व्यवस्था सुरू झाली आहे.
आजपासून नागपूर स्थानकावर मिस्टिंग सुविधेला सुरुवात
नागपूर (Mist Cooling System) : कडक उन्हाने होरपळणाऱ्या विदर्भात आता रेल्वे प्रवाशांनादिलासा देणारी गार व्यवस्था सुरू झाली आहे. नागपूर रेल्वेस्थानक येथे आजपासून प्लॅटफॉर्मवर मिस्टिंग प्रणाली कार्यान्वित होत असून, उन्हाच्या तीव्र झळांमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. तापलेल्या प्लॅटफॉर्मवर उभे राहणे जिथे अवघड झाले होते तिथे आता सूक्ष्म पाण्याच्या फवाऱ्यांमुळे थंडावा अनुभवायला मिळणार आहे.
मार्च अखेरपासून वाढलेल्या तापमानामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची गैरसोय वाढली होती. दुपारच्या वेळेत प्लॅटफॉर्मवर थांबणे कठीण होत होते तर प्रतीक्षालयांची क्षमता मर्यादित असल्याने अनेकांना उन्हातच थांबावे लागत होते. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे प्रशासनाने मिस्टिंग प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्लॅटफॉर्म क्रमांक १,२ आणि ३ वर बसवण्यात आलेली ही प्रणाली गाडी येताच सुरू होईल. छतावर लावलेल्या सूक्ष्म पाईपमधून दर काही मिनिटांनी अतिसूक्ष्म पाण्याचे फवारे सोडले जातील ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होईल. विशेष म्हणजे या फवाऱ्यांमुळे प्रवासी भिजत नाहीत तर फक्त थंडावा जाणवतो. वर्ल्ड क्लास स्थानकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूर स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी ही आधुनिक सुविधा महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
मिस्टिंग प्रणाली म्हणजे काय?
ही एक आधुनिक शीतकरण यंत्रणा असून छतावर बसवलेल्या पाईपमधून अतिसूक्ष्म पाण्याचे फवारे सोडले जातात. हे फवारे वातावरणातील तापमान कमी करतात मात्र अंगावर पडूनही भिजल्यासारखे वाटत नाही. सुमारे १२ लाख रुपये खर्च करून ही प्रणाली उभारण्यात आली आहे.
प्रवाशांना कसा होणार फायदा?
उन्हाळ्यात प्लॅटफॉर्मवर थांबणे त्रासदायक ठरते. मिस्टिंग प्रणालीमुळे थंडावा निर्माण होऊन गरम वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल. लू लागण्याचा धोका घटेल आणि प्रतीक्षेचा वेळ अधिक सुसह्य होईल. त्यामुळे उन्हाळ्यातील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी ठरणार आहे.