मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांदरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गोल्डन नेट परिसरातील दुर्घटनेनंतर रस्त्यावर मलबा; वाहतूककोंडी, मनसे आक्रमक, कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांदरम्यान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिरा भाईंदरमधील गोल्डन नेट परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना अचानक स्लॅबचा मोठा भाग खाली कोसळल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, त्याच वेळी खालीून शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस जात होती. सुदैवाने स्लॅब बसच्या अगदी जवळ कोसळला आणि मोठा अनर्थ टळला.
मिरा रोड परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मेट्रोच्या बांधकामामुळे मुंबई आणि उपनगरांतील वाहनचालक व नागरिकांना आधीच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित करणारी ही घटना घडल्याने चिंता वाढली आहे.
स्लॅब कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. रस्त्यावर पडलेला मलबा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या मलब्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच मिरा रोड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.
दरम्यान, बांधकामाच्या ठिकाणी नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप करत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा मेट्रोचे काम सुरू ठेवू देणार नाही, असा इशारा मनसेचे नेते संदीप राणे यांनी दिला आहे.
या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी शाळकरी मुलांची बस घटनास्थळी असताना स्लॅब कोसळल्याने पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बांधकाम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली जाते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मेट्रोच्या कामातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत
मेट्रोच्या बांधकामातील सुरक्षेवर यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. ठाण्यातील माजिवडा परिसरात मेट्रोचे काम सुरू असताना स्लॅब पडण्याच्या स्थितीत असल्याचा व्हिडिओ यापूर्वी समोर आला होता. त्यानंतर आता मिरा भाईंदरमध्ये स्लॅबचा भाग थेट रस्त्यावर कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेसह सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू असताना प्रवासी, वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.