शहरातील तारसा रोड रेल्वे उड्डाणपूल, एमजी नगर येथे भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
अपघातानंतर नागरिकांचा चक्का जाम आंदोलन; जड वाहतुकीवर बंदीची जोरदार मागणी
कन्हान (MG Nagar Flyover) : शहरातील तारसा रोड रेल्वे उड्डाणपूल, एमजी नगर येथे भरधाव ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवार (दि.११) जून रोजी रात्रीच्या सुमारास नितीन नामदेव सरोते (वय ३५, रा. बोरी-सिंगोरी) हे आपल्या अॅक्टिव्हा स्कुटी क्रमांक MH 40 BN 7486 ने कन्हान वरून तारसा मार्गे घरी जात होते. त्याच वेळी तारसा रोडने कन्हानकडे येणाऱ्या ट्रक क्रमांक MH 40 BL 6419 च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत विरुद्ध दिशेने येऊन दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नितीन सरोते हे वाहनासह रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी नितीन सरोते यांना उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी प्रमोद नामदेव सरोते यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नागरिकांचे चक्का जाम आंदोलन; जड वाहतुकीवर बंदीची मागणी
गुरुवारी रात्री झालेल्या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी शुक्रवार (दि.१२) सकाळी तारसा रोड गहुहिवरा चौकात चक्का जाम आंदोलन केले. तारसा रोड व रेल्वे पुलावरून सुरू असलेली जड वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शहरातून व रेल्वे उड्डाणपुलावरून जड वाहतूक बंद असतानाही मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहने या मार्गाने धावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
कोळसा, राख, गिट्टी व माती वाहून नेणारे ट्रक टोल नाका टाळण्यासाठी शहरातून मार्गक्रमण करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावर शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ तसेच मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने अपघाताचा धोका वाढल्याचेही सांगण्यात आले. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने जड वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनाची माहिती मिळताच कन्हानच्या पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
यानंतर बराच वेळ समजूत काढल्यानंतर आणि कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी चक्का जाम आंदोलन मागे घेतले. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. मात्र, जड वाहतुकीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून कायम आहे.